परतीचा पाऊस : कापलेल्या सोयाबिनाचे मोठे नुकसान
सेलू तालुक्यात मोठा फटका, हातनूर शिवारात उडाली दैना
सेलू, ता.6 ( प्रतिनिधी ) : बुधवारी सायंकाळी व रात्री झालेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे हातनूर, साळेगाव शिवारातील कापून ठेवलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यंदा सोयाबिनचे पिक चांगले बहरात होते. परंतु; तालुक्यातील सोयाबिनच्या शेंगा भरत असतांना जोरदार अतिवृष्टीमुळे पाहिजे त्या प्रमाणात शेंगा भरल्या नाहीत. उतारा कमी येण्याची शक्यता अतिवृष्टीने बळावळी. त्यात परतीच्या पावसाचा अंदाज घेत, शेतकऱ्यांनी सोयाबिन कापणीला सुरवात केली. परंतु; कापणी झालेल्या पेंढ्या मळणीच्या प्रतीक्षत शेतात पडून होत्या. बुधवारी रात्री अचानत पाऊस झाला. त्यात संपूर्ण शेतात पाणी साचले. वाळलेले सोयाबिन भिजून बरचसे मातीत मिसळले. यामुळ आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. शिवाय बाजारात सोयाबिनला भावही कमी मिळत आहे. यंदा किमान सात हजार भाव मिळेल या आशेत असलेल्या शेतकऱ्यांना चार हजाराच्या पुढे सध्या बाजारपेठे भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.