कीर्तन : श्वासागणिक भगवंताचे नाम चिंतन हवे : ढोक महाराज 

कीर्तन : श्वासागणिक भगवंताचे नाम चिंतन हवे : ढोक महाराज 

रामराव महाराज ढोक : सेलू तालुक्यातील कवडधन येथे कीर्तन, श्रोत्यांची मोठी उपस्थिती 

सेलू,जि.परभणी : प्रत्येकाकडून दिवसभरात २१ हजार ६०० वेळा श्वास आत बाहेर सोडण्याची प्रक्रिया होते. त्यावेळी श्वासाची किंमत मानवाच्या लक्षात येत नाही. मात्र; मृत्यूनंतर एक वेळादेखील श्वास आत बाहेर सोडता येत नाही. सर्व संपत्ती मोजली तरी हे शक्य नाही. त्यामुळे आयुष्य पुढे पुढे जात आहे. देवाचे चिंतन करा. यातच हित आहे‌ आणि हे हीत संतांच्या संगतीतच कळते. त्यामुळे क्षणोक्षणी नामस्मरणामुळे मुक्ती मिळते. श्वासागणिक भगवंताच्या नामस्मरणात मानवाची खरी श्रीमंती आहे, असे हभप रामराव महाराज ढोक म्हणाले. 

माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे यांच्यावतीने सेलू तालुक्यातील कवडधन येथे रविवारी, ९ ऑक्टोबर रोजी ढोक महाराजांचे कीर्तन झाले. ” उठा जागे व्हावे, आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माची ” या संत नामदेव महाराजांच्या अभंगावर ढोक महाराजांनी या वेळी चिंतन मांडले. महाराज म्हणाले, ” जन्माला येणाऱ्या प्रत्येकाची श्वसन प्रक्रिया सुरू आहे. बसलेले असताना मिनिटाला १२ वेळा, चालताना १८ वेळा, झोपेत २४ आणि मद्यप्राशन केल्यानंतर ३० वेळा श्वास आत बाहेर सोडला जातो, असे दिवसभरात २१ हजार ६०० वेळा श्वास आत बाहेर सोडण्याची प्रक्रिया होते. तोपर्यंत त्याला त्याचे महत्त्व कळत नाही. मात्र; मृत्यूनंतर ही प्रक्रिया पूर्णपणे थांबते. त्यावेळी कितीही पैसे मोजले तरी देखील पुन्हा श्वसन प्रक्रिया पूर्ववत होत नाही. म्हणून मानवाची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आयुष्य आहे. संसार हा समुद्र आहे. संत स्वतःजागे असतात, म्हणून ते आपल्याला जागे व्हा असे सांगतात, त्यांना तो अधिकार आहे. आपण सगळे जागे आहोत. संसारात परमार्थासाठी आपण सगळे झोपेत आहोत. जन्माच्या व्यथा चुकविण्यासाठी संत उपदेश करतात. परमार्थाचे विस्मरण होऊ देऊ नका. जागे व्हा, आणि परमार्थ करा. संसार करत असताना धन, घर, पत्नी, पुत्र, बंधू, सगेसोयरे, समाज याची गरज आहे. मात्र, या सर्व गोष्टी मिथ्य आहेत. त्या आपल्याला सत्य वाटतात आणि परमार्थ हा सत्य आहे. तो आपल्याला मिथ्य वाटतो. सत्य ते मिथ्य व मिथ्य ते सत्य वाटण्याचे कारण म्हणजे माया आहे. माया असलेले लपवते आणि नसलेले दाखवते. मी आणि माझे म्हणणे म्हणजेच माया होय. ज्याला आपण माझे म्हणतो ते सर्व इथेच राहाते. आयुष्याचे सत्य संतसंगती व परमार्थ यातच आहे. त्यामुळेच मुक्ती मिळू शकते. ” या वेळी स्वर्गीय आण्णासाहेब काकडे व स्वर्गीय गंगुबाई काकडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. पसायदानानंतर महाप्रसादाने सांगता झाली. श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!