धम्म वाचन : सेलूत मोठा प्रतिसाद, मान्यवरांनी लावली हजेरी
धम्माने सांगितलेल्या मार्गानेच जगात शांतता नांदेल : पत्रकार ज्ञानेश्वर खंदारे यांचे प्रतिपादन
सेलू (जि.परभणी) : भगवान बुद्धांचा धम्म हा प्रज्ञा, शील, करुणा, बंधुभाव व मैत्री या मानवी मूल्यांची शिकवण देणारा असून, तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सखोल विचारांती स्वीकारलेला हा धम्म कल्याणकारी आहे. धम्माने सांगितलेल्या मार्गानेच जगात शांतता नांदेल, असे प्रतिपादन पत्रकार ज्ञानेश्वर खंदारे यांनी केले. रविवारी, ९ आक्टोबर रोजी धम्मोदय बुद्ध विहार येथे आयोजित भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म, या कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी खंदारे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचार मांडले. अध्यक्षस्थानी वैशाली चव्हाण यांची उपस्थिती होती. शिवाजीराव वाघमारे, प्रा. के.डी.वाघमारे, नाथाराम धापसे, काशीनाथ वाघमारे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. पुढे बोलताना खंदारे म्हणाले, की बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नातून समाजाची प्रगती होत आहे. याची समाजातील सर्व घटकांनी जाणीव ठेवावी ; तसेच बाबासाहेबांमुळे आपण ऊंच शिखरे गाठू शकलो. सद्य परिस्थितीतही जगाला युध्दाची नाही तर बुध्दांची गरज आहे. अध्यक्षीय भाषणात वैशाली चव्हाण यांनी, समाजाने बाबासाहेबांनी महत्प्रयासाने समाजाचे केलेले सारथ्य आपणास पुढे न्यायचे आहे. त्याकरीता आपल्या मुलांना संस्कारीत करून शिक्षण द्यावे, असे आवाहन केले. या प्रसंगी उषा वाघमारे, वैशाली काकडे, ॲड.प्रधान, अभिमान पाईकराव यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक छाया वाघमारे, सूत्रसंचालन छाया पाईकराव, तर प्रियांका गायकवाड यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी यशोधरा महिला मंडळाने परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती.