ओला दुष्काळ जाहीर करा : रायपुरच्या शेतकऱ्यांचे पिकांतील पाण्यात आंदोलन
पिकांचे मातेरे झाले, मात्र अधिकारी फिरकलेच नाहीत, तात्काळ पंचनामे करण्याची मागणी
सेलू (जि.परभणी) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करावेत. शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून द्यावी. परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. या मागणीसाठी सोमवारी, १७ ऑक्टोबर रोजी सेलू (जि.परभणी) तालुक्यातील रायपूर गावातील संतप्त शेतकऱ्यांनी पिकांतील पाण्यात उभे राहून आंदोलन केले.
सकाळी नऊच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ११ ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. संततधार पाऊस चालू आहे. यामुळे हाताशी आलेले सोयाबीन व कापसाचे पिक मातीत गेले. परंतु; प्रशासनाचा एकही अधिकारी फिरकला नाही. रायपूर, हातनूर, साळेगाव शिवारात ढगफुटी सदृश पाऊस झाला. यामध्ये सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले. पाणी साचल्याने उभे सोयाबीन पिक व कापून ठेवलेल्या सोयाबीनचे मातेरे झाले. अजुनही पंचनामे करण्यासाठी अधिकारी गावात पोहोचले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी रामेश्वर गाडेकर, गुलाबराव गाडेकर, सचिन गाडेकर, वसंत गाडेकर, वैभव गाडेकर, पांडुरंग सोळंके, अशोक गायकवाड, सुरेश गाडेकर, अमोल गाडेकर, माऊली हिंगे, बालासाहेब हिंगे, संतोष गाडेकर, बाळासाहेब गाडेकर, विकास हिंगे, पंकज गाडेकर, राजू गिरी यांच्यासह गावातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.