निम्न दुधना : दहा दरवाज्यातून पाणी नदीपात्रात; राजेवाडी-वालूर वाहतूक ठप्प
दुधना नदीच्या पाणी पातळीत वाढ, १०१०० क्युसेक विसर्ग
सेलू जि.परभणी : सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना सिंचन प्रकल्पाचे बारा दरवाजे टप्प्याटप्प्याने ०.३० मीटरने सोमवारी (१७ ऑक्टोबर) उघडण्यात आले. दुपारी तीन वाजल्यापासून वीस पैकी बारा दरवाज्यातून १२१२० क्युसेक दराने नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला होता. राजेवाडी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने, दुपारी चार वाजल्यापासून वालूर वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, सायंकाळी साडेसहा वाजता दोन दरवाजे बंद करून विसर्ग घटविण्यात आला. १०१०० क्युसेक दराने नदीपात्रात पाणी सुुुरू आहे.
पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ झाली. जिवंत पाणी साठा १८१.७८० दशलक्ष घनमीटर (७५.०५ टक्के) झाला. या वर्षी जून महिन्यापासून जिवंत पाणी साठ्यावर ७५ टक्के मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे द्वार परिचालन आराखड्यानुसार सकाळी सहा वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन निम्न दुधना सिंचन प्रकल्प, पूर नियंत्रण कक्षाने केले आहे.