शिवसेना : सेलूत जोरदार रास्तारोको आंदोलन, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी
शिवसैनिकांची घोषणाबाजी : हेक्टरी ३५ ते ४५ हजार रुपये नुकसानभरपाईची मागणी, तहसीलदार दिनेश झांपले यांनी स्वीकारले निवेदन
सेलू जि.परभणी : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून परतीचा पाऊस,अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सेलू, जिंतूर तालुक्यातील; तसेच परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त भागातील पंचनामे तातडीने करुन, शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी. या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने बुधवारी (१९ ऑक्टोबर) जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी जिल्हा परिषद गटनेते तथा जिंतूर – सेलू विधानसभा प्रमुख रामनाना खराबे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगड कॉर्नरवर सकाळी अकराच्या सुमारास हे आंदोलन झाले.
या वेळी तहसीलदार दिनेश झांपले यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले. सेलू तालुक्यात व संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सतत जोरदार पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. या संदर्भात खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना निवेदन दिलेले आहे. तरीही शासनामार्फत काहीही आदेश देण्यात आलेले नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. सेलू तालुक्यामध्ये सर्व पिके जोमदार आली असताना, अचानक सर्व पाच ऑक्टोबरपासून ते आजपर्यंत पडत असलेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक फटका बसला आहे. शेतकर्यांच्या तोंडचा घास गेला आहे. त्यामुळे कोरडवाहूकरीता हेक्टरी ३५,००० रुपये, तर बागायतीकरीता ४५,००० रुपये नुकसान भरपाई व पिकविमा मिळवून देवून न्याय दयावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर रामनाना खराबे पाटील, रणजित गजमल, रमेश डख, मनीष कदम, गौतम कनकुटे, अतुल डख, सुधाकर पवार, रामेश्वर बहिरट, वैभव वैद्य, विठ्ठलराव कारके, जीवन चव्हाण, माऊली सोळंके, गुलाब खेडेकर, विष्णू नाईकनवरे, कृष्णा तिडके, दिपक झिंबरे आदींच्या सह्या आहेत.