अक्षर व्याख्यानमाला : शेतकऱ्यांच्या पोरांनी पेटून उठावे : अमर हबीब यांचे मत
आहेर बोरगावात शेतकरी नेते अमर हबीब यांचे मत, प्रगतीशील ६० शेतकऱ्यांचा सन्मान, शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानाचा उपक्रम
सेलू जि.परभणी : सर्जक असलेला शेतकरी उद्धवस्त झालाय, तर स्त्रियांवर अत्याचार वाढताहेत. मात्र, सरकारला काही देणे घेणे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने काम करणारे, त्यांना निर्बंधमुक्त करून स्वातंत्र्य देणारे राज्य निर्माण करायचे असेल, तर सर्जकांच्या बाजूने आवाज बुलंद करावा लागेल. त्यासाठी आता विविध क्षेत्रातील, विशेषत: मुंबई-पुण्यासारख्या अन्य मोठ्या शहरांतील शेतकऱ्यांच्या पोरांनीच एकजुटीने पुढाकार घेत, पेटून रान उठविण्याची गरज आहे, असे मत, किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी बुधवारी (१९ ऑक्टोबर) व्यक्त केले.
भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम जयंतीनिमित्त सेलू येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्यावतीने अक्षर व्याख्यानमाला झाली.आहेर बोरगाव येथील नितीन माध्यमिक विद्यालयात बुधवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. त्यावेळी अमर हबीब बोलत होते. ‘आता उठवू सारे रान’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर अध्यक्षस्थानी होते. कवी इंद्रजित भालेराव, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, कांतराव झरीकर,गजानन वाघमारे, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लहाने, माणिक कदम, माणिक रासवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हबीब म्हणाले, ” सर्जक विरुध्द बांडगूळ हाच खरा संघर्ष आहे. पहिल्याच घटना दुरुस्तीत २८४ पैकी २५० कायदे हे शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र आहे. या देशातील शेतकऱ्याला बेड्या घालून त्याच्याकडून काम करून घ्यायचा हा कट आहे. त्यामुळे एक संवेदना शेतकऱ्यांप्रती व्यक्त करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाच्या माध्यामातून जागर सतत घालायचा आहे.” या वेळी परभणी जिल्ह्यातील ६० प्रयोगशील पुरुष व महिला शेतकऱ्यांचा आणि षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्ताने कवी इंद्रजित भालेराव यांचा सत्कार करण्यात आला. महाकवी कालिदासानंतर चिखलीच्या मेळाव्यात शरद जोशींनी ‘शेतकर्यांचा महाकवी’ ही उपाधी कवी इंद्रजित भालेराव यांना दिली.देवाच्या पायावर पडलेलं फूल ते आहेत. अशा शब्दात अमर हबीब यांनी भालेराव यांचा गौरव केला. शेतकरी व कवीचा सन्मान हा ‘सर्जकोत्सव’ जगात तोलामोलाचा आहे, असे हबीब यांनी या वेळी नमूद केले.
सन्मानाला उत्तर देताना कवी इंद्रजित भालेराव म्हणाले, रूमणं हा पृथ्वीचा आस आहे. या रूमण्याच्या जोरावर कुणब्याने स्वत:च्या हिंमतीवर जगाला पोसलेले आहे. याच कुणब्याची मी कविता लिहिली. ‘शेतकरी’ हाच माझा पक्ष आहे. ‘कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक’ ही कविता शेतकरी संघटनेने रौप्य महोत्सवात अमर हबीब यांच्यामुळेच स्वीकारली. महात्मा फुले यांच्यानंतर मी कवितेत शेतकरी हा ‘निर्मिक’ शब्द वापरून शेती व शेतकर्यांच्या तत्वज्ञानावर आधारित पहिल्या पासूनच कविता लिहिली. माझ्याबरोबर ६० शेतकर्यांचा सन्मान ही अभूतपूर्व घटना आहे.
प्रास्ताविक मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश हिवाळे, तर सुभाष मोहकरे यांनी आभार मानले. सच्चिदानंद डाखोरे, गिरीश दीक्षित, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, शरद ठाकर, डॉ.अशोक पाठक, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, अरुण चव्हाळ, त्र्यंबक वडसकर, रमेश नखाते, माधव गव्हाणे, ज्ञानेश्वर सोळंके, एकनाथ जाधव, डॉ.सतीश मगर, नितीन विद्यालयाचे शिक्षक, कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
कवी इंद्रजित भालेराव म्हणाले, ” रूमणं हा पृथ्वीचा आस आहे. या रूमण्याच्या जोरावर कुणब्याने स्वत:च्या हिंमतीवर जगाला पोसलेले आहे. याच कुणब्याची मी कविता लिहिली. ‘शेतकरी’ हाच माझा पक्ष आहे. ‘कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक’ ही कविता शेतकरी संघटनेने रौप्य महोत्सवात अमर हबीब यांच्यामुळेच स्वीकारली. महात्मा फुले यांच्यानंतर मी कवितेत शेतकरी हा ‘निर्मिक’ शब्द वापरून शेती व शेतकर्यांच्या तत्वज्ञानावर आधारित पहिल्या पासूनच कविता लिहिली. माझ्याबरोबर ६० शेतकर्यांचा सन्मान ही अभूतपूर्व घटना आहे.”