पक्षी येती अंगणी : निसर्गाशी एकरूप करणारी कादंबरी : अतुल देऊळगावकर
माणिक पुरी यांच्या कादंबरीचे परभणीत प्रकाशन
परभणी : निसर्ग,पर्यावरणाची पडझड थांबवणे हे सर्वस्वी माणसांच्याच हाती आहे. पुढच्या पिढ्यांना निसर्ग कळावा असे वाटत असेल तर आपण निसर्गात जाऊन त्याला आत्मसात केले पाहिजे. हिच वैश्विक भूमिका ‘ पक्षी येती अंगणी ‘ या आपल्या कादंबरीत पक्षीनिरीक्षक माणिक पुरी यांनी मांडून निसर्ग आणि माणूस यांचे नव्याने नाते दृढ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले. शहरातील बी. रघुनाथ सभागृहात रविवार ( सहा नोव्हेंबर) रोजी माणिक पुरी यांच्या ‘पक्षी येती अंगणी’ कादंबरीचे प्रकाशन देऊळगावकर यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव होते. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. आसाराम लोमटे, कवी श्रीधर नांदेडकर यांची उपस्थिती होती. देऊळगावकर म्हणाले की, ‘ निसर्ग आणि मानवाच्या मध्ये द्वंद्व सुरू झाले आहे. माणूस निसर्ग, पक्षी, प्राणी यांच्यापासून दूर जातो आहे. माणिक पुरी यांची कांदबरी माणसांना निसर्गाशी एकरूप करून निसर्ग समजून घ्यायला मदत करते.’
डॉ.आसाराम लोमटे म्हणाले, ” ज्या निसर्ग, पर्यावरणामुळे आपले अस्तित्व आहे. ते वाचले पाहिजे. निसर्ग, पशूपक्षी जिवंत असतील तरच माणूस जिवंत राहील. हे भान आपल्याला देणारी ‘ पक्षी येती अंगणी’ ही माणिक पुरी यांची कादंबरी आहे.” सूत्रसंचालन अरविंद सगर यांनी केले. त्र्यंबक वडसकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रा.भगवान काळे, प्रा.हनुमान व्हरगुळे, गंगाधर गायकवाड, सुरेश हिवाळे, शरद ठाकर, बबन आव्हाड, माधव गव्हाणे, बाळू बुधवंत, विजय ढाकणे, अनिल उरटवाड, अनिल स्वामी आदींनी परिश्रम घेतले.