शिवसेना : बेधडक मोर्चाने परभणी दणाणले
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध प्रश्नांवर शिवसेनेच्या वतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मंगळवारी (१५ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर बेधडक मोर्चा काढण्यात आला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख आमदार रविंद्र वायकर, खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. पीकविम्याचा प्रश्न असो की, परतीच्या पावसात झालेली अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या दुष्टचक्रात अडकला आहे. पीकविम्याची ऑनलाईन नोंदणी केलेली असली, तरी तक्रारीसुद्धा ऑनलाईन करण्याचे सांगितले जाते. परिणामी नुकसान होवूनही शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाला जागे करण्यासाठी बेधडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार बाजारापासून निघालेला हा मोर्चा नानालपेठ कॉर्नर, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळ स्टेशन रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. उपोषण मैदानावर जाहीर सभेत रूपांतर झाले. या वेळी महिला आघाडी संपर्क प्रमुख ज्योती ठाकरे, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, डॉ.विवेक नावंदर, गंगाप्रसाद आणेराव, अंबिका डहाळे, सखुबाई लटपटे, अर्जुन सामाले, संजय सारणीकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, या मोर्चामध्ये शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत बाजारपेठ दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, जय भवानी, जय शिवाजी, हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, आवाज कोणाचा शिवसेनाचा, कोण आला रे कोण आला शिवसेनाचा वाघ आला. कोण म्हणत देतं नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. पीक विमा हक्काचा नाही कोणाच्या बापाचा या घोषणांसह राज्य सरकारच्या विरोधात दिलेल्या, पन्नास खोके एकदम ओके, कृषीमंत्र्यांचे करायचे काय खाली मुंडक वर पाय या घोषणांनी लक्ष वेधले.