शेतमाल तारण कर्ज : सेलू बाजार समितीची योजना; शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
मुख्य प्रशासक अब्दागिरे यांची माहिती : व्याजदर @ ६%, तारण शेतमाल किंमतीच्या ७५ टक्के कर्ज सुविधा
सेलू, जि.परभणी : शेतकर्यांना आर्थिक हातभार देण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती सेलूच्या वतीने २०२२- २३ या हंगामातील उत्पादित शेतमालावर शेतमाल तारण कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. अल्प व्याजदरात सुलभ कर्ज योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक एस.व्ही.अब्दागिरे यांनी केले आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल सुरक्षित राहावा व त्या मालास योग्य भाव आल्यानंतर विक्री करता यावा यासाठी या कार्यालयाने कृषि पणन मंडळ महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत वखार महामंडळाच्या गोदामामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, चना हा शेतमाल ठेवल्यास वजन काट्यावरील वजन पावतीवर एकूण वजनाचे त्या दिवसाचे बाजारभाव किंवा हमीभावानुसार जो दर कमी असेल त्या दराने एकूण वजनावरील किंमतीवर ७५ टक्के रक्कम कर्ज स्वरूपात ६ टक्के व्याज दराने एकूण १८० दिवसांसाठी दिले जाईल. सन २०२१-२२ मध्ये शेतमाल तारण योजने अंतर्गत बाजार समिती कार्यक्षेत्रातील ४० शेतकर्यांना गतवर्षी ५८.२१.८८०/- लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतकर्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेसाठी अद्यावत सातबारा, पिकपेरा उतारा, आधारकार्ड, शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर, वखार महामंडळाची पावती इत्यादी कागदपत्रासह कृषि उत्पन्न बाजार समितीकडे अर्ज करावा व या योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य प्रशासक अब्दागिरे, सचिव आर.आर.वाघ यांनी केले आहे.
शनिवारपासून कापूस खरेदी हंगाम
कापूस हंगाम सन २०२२-२३ दि.१९ नोव्हेंबर, शनिवार रोजी दुपारी दीड वाजेच्या शुभमुहूर्तावर चालू होत आहे. तरी शेतकरी बांधवानी आपली वाहने मुख्य कापूस यार्ड पाथरी रोड सेलू येथे रांगेत लावून सहकार्य करावे. असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री. एस.व्ही. अब्दागिरे व सचिव आर. आर.वाघ यांनी केले आहे.
शेतकर्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेसाठी अद्यावत सातबारा, पिकपेरा उतारा, आधारकार्ड, शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर, वखार महामंडळाची पावती इत्यादी कागदपत्रासह कृषि उत्पन्न बाजार समितीकडे अर्ज करावा व या योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य प्रशासक एस.व्ही.अब्दागिरे, सचिव आर.आर.वाघ यांनी केले आहे.