श्री केशवराज फेस्टिवल : डोळ्याचे पारणे फेडणारा नयनरम्य सोहळा, सेलूतील रसिकांची मोठी उपस्थिती
श्री केशवराज बाबासाहेब यात्रेनिमित्त माजी जिल्हा परिषद सभापती अशोक काकडे यांचे आयोजन, सांस्कृतिक मेजवानीने रसिक तृप्त
Authored By Babasaheb Helaskar
सेलू ( जि.परभणी) : येथील ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशाह) यात्रा महोत्सवानिमित्त नूतन विद्यालयाच्या क्रीडांगणावर तीन दिवसांच्या श्री केशवराज फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे आयोजक होते. सोमवारी (२८ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे, श्री केशवराज बाबासाहेब मंदिर संस्थांनचे पुजारी सुधीर मंडलिक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. माजी आमदार विजय भांबळे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचे कीर्तन झाले. संत तुकाराम महाराजांचा ‘ज्याची करी सेवा,त्याच्या भय काय जीवा’ या अभंगातून विविध दृष्टांत व उदाहरणासह सेवेचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
जबाबदारी वाढली; निश्चितच पूर्ण करणार
यावेळी सत्काराला उत्तर देतांना भांबळे म्हणाले, “ अशोक काकडे व सहकाऱ्यांनी जो शंभर किलो वजनाचा पुष्पहार घालून सर्वांच्या साक्षीने माझे अभिष्टचिंतन केले.यामुळे माझी जबाबदारीदेखील तेवढीच वाढली आहे. ती निश्चितच पूर्ण करणार आहे. सेलू करांचे प्रेम पाहून मी भारवून गेलो आहे. शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराजांच्या यात्रेला प्राचीन परंपरा आहे. परंतु त्यांच्या नावाने फेस्टिवल साजरा करून सेलूकरांना सांस्कृतिक मेजवानीचा लाभ मिळवून दिल्याबद्दल अशोक काकडे यांचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे.
यावेळी आयोजक अशोक काकडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले. राधाकिशन महाराज हिस्सीकर यांनी आभार मानले. प्रदेश सरचिटणीस पंकज बोराडे,साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर,अजय चौधरी, राजेंद्र लहाने, रामराव उबाळे,राजेंद्र मणियार,निलेश बिनायके,अजय अवचार,पवन आडळकर, संतोष कुलकर्णी, डॉ.अशोक नाईकनवरे, मनोज थिटे.जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, रणजित गजमल,विनायक पावडे, छगन शेरे, पुरुषोत्तम पावडे,माऊली ताठे,सुधाकर रोकडे, भारत इंद्रोके, अशोक उफाडे, रघुनाथ बागल,कौसर भाई, आप्पासाहेब डख,गोरख भालेराव, पप्पू शिंदे, सचिन शिंदे, अजय डासाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती, दरम्यान, विजयराव भांबळे यांच्या वाढदिवसानिमित प्रातिनिधिक स्वरूपात ५ दिव्यांगाना अशोक काकडे यांच्या वतीने उबदार रगीचे वितरण, तर रामप्रसाद घोडके यांनी आरोग्य रूग्णवाहिकेचे लोकार्पण केले, 29 नोव्हेंबर रोजी क्रांती मळेगावकर यांचा ‘न्यू होम मिनिस्टर…खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिलाद मिळाला.121 विविध प्रकारच्या बक्षीसांची लयलूट महिलांनी केली. विजयी स्पर्धकांना मानवरांच्या हस्ते बक्षीसे वाटप करण्यात आली. 30 नोव्हेंबर रोजी ४० कलाकारांच्या गीत संगीताने नटलेला ‘मराठी पाऊल पडती पुढे’ या बहारदार कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली.
पुरस्कारांचे दिमाखात वितरण
श्री केशवराज फेस्टिवलच्या निमित्ताने सेलू शहराचे ऋषीतुल्य व्यक्तित्व प्राचार्य डी.आर.कुलकर्णी यांना सेलूकरांच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले, शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, शंभर किलो वजनाचा फुलांचा हार ,असे पुरस्काराचे स्वरूप होते. याच लेळी महेश भूषण पुरस्काराबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहचिटणीस तथा उद्योजक जयप्रकाशजी बिहाणी, तसेच उद्योजक रामप्रसादजी घोडके यांनादेखील उद्दमव्रती पुरस्काने गौरविण्यात आले.श्री केशवराज बाबासाहेब मंदिर संस्थान तसेच राष्ट्रवादी कॉंग्रसे पार्टी तर्फे आयोजक अशोक काकडे यांचा श्री केशवराज फेस्टिवलच्या सुंदर आयोजनाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांना दिलेल्या बाबासाहेब हेलसकर लिखित सन्मानपत्राचे वाचन अशोक उफाडे यांनी केले, तर प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या जीवनाचा थोडक्यात आढावा घेणारी किशोर कटारे निर्मित ध्वनीचित्रफित प्रदर्शित करण्यात आली. सुरेश हिवाळे यांनी निवदेन केले.
या वेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, चिटणीस विनायकराव कोठोकर, नंदकिशोर बाहती, हेमंतरराव आडळकर,डॉ.संजय रोडगे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी,डॉ.सुनील कुलकर्णी, छगन शेरे, अशोक अंभोरे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डी.आर.कुलकर्णी म्हणाले “एवढा भव्य दिव्य सोहळा, संघटन मी 90 वर्षात पाहिले नाही. नवी फेस्टिवलची कल्पना नवी आहे. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणार हा सोहळा आहे. माझे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी हा भव्यदिव्य सोहळा घडवून आणला आहे. या विद्यार्थ्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श सर्वांनी घ्यावा. कारण हा सोहळा मनाची श्रीमंती दर्शविणारा सोहळा आहे. यानिमित्ताने तत्कालीन शिक्षण संचालक वि.वि. चिपळूणकर, तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांची प्रकर्षाने आठवण होते. विद्यार्थी हा शिक्षण पद्धीतीचा केंद्र बिंदू आहे. शिक्षक हा विद्यार्थी परायण असावा, विद्यार्थी शिक्षण परयाण असावा. शिक्षण हे ज्ञान परायण असावे. ज्ञान हे सेवा परायण असावे, असेच चिंतन यानिमित्ताने करता येईल, असे प्राचार्य डी.आर.कुलकर्णी म्हणाले.
सर्व छायाचित्रे : शंभू काकडे