Brahmakumaris : मनाची शक्ती, एकाग्रता वाढवा : पल्लवी चव्हाण
सेलूतील ‘ब्रह्माकुमारीं’चा नूतन विद्यालयात कार्यक्रम, आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
सेलू,जि.परभणी, 16 डिसेंबर : वय वर्ष १४ ते २४ हा दहा वर्षांचा कालावधी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. विधायक वळण लावण्याचा हा काळ आहे. या टप्प्यावर मन, बुद्धी स्थिर ठेवून कठोर परिश्रमातून उज्ज्वल भविष्य आकाराला येते. त्यासाठी मनाची शक्ती आणि एकाग्रता वाढविण्यावर विद्यार्थ्यांनी अधिक भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई येथील योगप्रशिक्षक पल्लवी चव्हाण यांनी गुरुवारी (१५ डिसेंबर) येथे केले.
सेलू येथील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने नूतन विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘विद्यार्थी संवाद व मार्गदर्शन’ कार्यक्रमात चव्हाण बोलत होत्या. या वेळी प्रभारी मुख्याध्यापक के.के.देशपांडे, सेलूच्या ब्रह्माकुमारी केंद्राच्या संचालिका सविता बहेन, राधा बहेन, उज्ज्वला लड्डा, प्रियंका श्रीवास्तव, बाबासाहेब हेलसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ, प्राणायाम, ध्यान धारणा आदींच्या माध्यमातून मनाची शक्ती वाढविणे आवश्यक आहे, असे सांगून चव्हाण यांनी परीक्षेतील ताण कमी करणे, मन स्थिर करणे, एकाग्रता, स्मरण शक्ती वाढविणे, विविध विषयांच्या अभ्यासाच्या पद्धती, ध्यान धारणा या विषयी मार्गदर्शन केले. सविता बहेन यांनी ब्रह्माकुमारी विद्यालयाचा परिचय व उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक के.के.देशपांडे, तर बाबासाहेब हेलसकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. प्रारंभी मानसी दलाल, सई कुलकर्णी, नम्रता बोराडे, समृद्धी राखे, वैष्णवी पिंपळगावकर, सानिका गझलकार यांनी ‘हिच आमुची प्रार्थना’ हे गीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश माळवे, काशिनाथ पल्लेवाड, प्रशांत नाईक, वीरेश कडगे यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.