अनुदान द्या हो : वालूर मंडळातील २१ गावांना अतिवृष्टी नुकसानभरपाई नाही; मुख्यमंत्र्यांना साकडे
दबाव गटाचे निवेदन, तीन वर्षांपासून अनुदान थकले
सेलू जि.परभणी : सन 2020 मधील अतिवृष्टी काळातील वालूर महसूल मंडळातील 24 गावांना अतिवृष्टी अनुदान देण्याची मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने करण्यात आली, असून या संदर्भाने एक जानेवारी पासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचे निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदन म्हटले आहे की, 26 ऑक्टोबर 2020 पासून सेलू तालुक्यातील वालुर महसूल मंडळातील 21 गावांत अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. सदर काळांत परभणी जिल्हयात सर्वत्र अतिवृष्टी झालेली असताना, केवळ सेलू तालुक्यातील वालूर महसूल मंडळातील 24 गावांना या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली नाही, असा अत्यंत चुकीचा अहवाल तत्कालीन तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी दिल्याने या 21 गावांना त्यावेळी 2020 मध्ये अतिवृष्टी होऊन ही वगळण्यात आले. त्यामुळे या महसूल मंडळातील शेतकर्यांवर नाहक अन्याय झाला. शेतकर्यांचे ताटात माती कालविण्याचे काम तत्कालीन तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी केले, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी, सेलू यांच्या कार्यालयासमोर दोन-तीन वेळा असंख्य शेतकर्यांनी लाक्षणिक उपोषण केले. लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तत्कालीन विरोधीपक्ष नेते मा. जा प्रविण दरेकर, मा. ना. देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेट घेऊन असंख्य शेतकर्यांनी निवेदन दिले.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना प्रत्यक्ष भेटून ही या संदर्भात निवेदन दिलेले आहे. मात्र कसल्याही प्रकारची सकारात्मक कार्यवाही झालेली नाही. शासन व प्रशासन या शेतकर्यांच्या न्याय मागणी बाबत उदासीन आहे. केवळ घोषणाबाजी चालू आहे. अतिवृष्टी व याच काळात लोअर दुधना धरणातून नदी पात्रात प्रचंड प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. याचा फटका पिकांना बसला. सन 2020 मधील अतिवृष्टी काळातील वालूर महसूल मंडळातील 24 गावांना अतिवृष्टी अनुदान देण्यात यावे, अन्यथा एक जानेवारी पासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर ॲड.श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ, ॲड.देवराव दळवे, रामचंद्र कांबळे, लक्ष्मण प्रधान, योगेश सुर्यवंशी, रौफ भाई, मुकुंद टेकाळे, दिलीप मगर, विलास केवारे, विलास रोडगे, रामचंद्र आधान, दत्तराव कांगणे, सतिश काकडे, अंबादास काकडे, अजित मंडलिक केशव डोईफोडे, दत्ता गायके, गुलाब पौळ, नारायण पवार, भुजबळ, उध्दव सोळंके, उत्तम गवारे, विजय मंत्री आदींच्या सह्या आहेत.