मराठा आरक्षण : न्यायालयात टिकणारे आरक्षण द्या : अर्जुन तनपुरे यांचे मत
कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे यांचे मत : मराठा सेवा संघाच्या महाअधिवेशनास शानदार सुरूवात, विविध कार्यक्रमांचा उत्साह
परभणी : मराठा समाजाला पन्नास टक्क्यांच्या आतील न्यायालयात टिकणारे देण्यात आले पाहिजे, असे मत मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जुन तनपूरे यांनी परभणीत शुक्रवारी (२३ डिसेंबर) व्यक्त केले.
मराठा सेवा संघाच्या राज्यव्यापी महाअधिवेशनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष कांतराव देशमुख, मराठा सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव भूसारे, समन्वय समितीचे नेते सुभाषराव जावळे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा कांचन कारेगावकर, सुनीता यादव, गजानन जोगदंड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
तनपुरे म्हणाले, ” विदर्भातील मराठा समाजाने कुणबी म्हणून आरक्षण मिळविले; परंतु मराठवाड्यातील मराठा समाज या आरक्षणापासून कोसोदूर राहीला. त्यावेळीच कै.पंजाबराव देशमुख यांनी या भागातील समाजबांधवांशी आरक्षणा संदर्भात हितगुज केले होते. परंतु, मराठवाड्यातील संस्थानिकांनी त्यावेळी आरक्षणास विरोध केला, असे तनपूरे यांनी नमूद केले. १९९० पासून संघटनेद्वारे समाजबांधवांना आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न केले जात आहेत. सुदैवाने सर्वस्तरावरुन, प्रत्येक सरकारने आरक्षणास होकार दिला आहे. मात्र, दुर्देवाने न्यायालयात हे आरक्षण टिकत नाही, त्यामुळेच मराठा समाजास टिकणारेच आरक्षण हवे आहे.”
मराठा सेवा संघाने स्थापनेपासून समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. विशेषतः उपेक्षितांना मदत मिळावी, यासाठी विधायक कार्यक्रम, उपक्रम राबविले आहेत. नांदेडला चार जानेवारीपासून मुलींसाठी वसतीगृह सुरु होत आहे. परभणीतसुध्दा हे वसतीगृह सुरु होईल. प्रत्येकी शंभर मुलीच्या क्षमतेच्या या वसतीगृहासाठी पालकत्व योजनाही यशस्वीरीत्या राबविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, असे स्पष्ट केले. सेवा संघाच्या घटनेतूनच समाजोपयोगी कामांना अग्रक्रम दिला आहे. सेव संघात जातीवादास थारा नाही, असे नमूद करीत कार्याध्यक्ष तनपूरे यांनी समाजाची स्थिती बिकट आहे. सर्वस्तरावर अनेक प्रश्न उभे आहेत. त्या प्रश्नांचे आकलन व्हावे, ते प्रश्न सुटावेत या दृष्टीने सेवा संघाद्वारे प्रयत्न होत आहेत, असे ते म्हणाले. या महाअधिवेशनात समारोपाच्या दिवशी महत्त्वपूर्ण असे ठराव मांडले जाणार आहेत. विशेषतः समाजबांधवांसाठी 50 टक्क्यांच्या आतील आरक्षण द्यावे, असा ठराव केला जाईल, अशी माहितीही दिली.
शोभायात्रा व ग्रंथादिंडीने वेधले लक्ष
मराठा सेवा संघ, परभणीतर्फे आयोजित राज्यस्तरीय महाअधिवेशनास आज शुक्रवार (दि.23) पासून सुरुवात झाली असून दुपारी 4 वा. छत्रपती शिवरायांचा पुतळा परिसर ते राजलक्ष्मी लॉन्स दरम्यान शोभायात्रा काढण्यात आली. ग्रंथदिंडीची सुरुवात डॉ. रामकिशन पवार, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष कांतराव देशमुख, मराठा सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव भूसारे,जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सौ. कांचन कारेगावकर यांच्या उपास्थितीत करण्यात आली.
यावेळी सर्वात अग्रभागी जिजाऊ यांचा पुतळा, नंतर शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ पुतळा, अनेक विद्यार्थी जिजाऊ, शिवराय, सावित्री, डॉ.बाबासाहे आंबेडकर, महात्मा फुले यांच्या वेशभुषेत सहभागी झाले होते. ग्रंथरथात संविधान, तुकाराम गाथा, डॉ.आ.ह. साळुंके यांचे साहित्य आदि ग्रंंथ ठेवण्यात आले होते. शिवशाहीर भारत कठाळे हे शिवनेरीहून आलेले खास आपल्या सजवलेल्या दुचाकीसह सहभागी झाले होते. लेझीम पथक, गोंधळी पथक, झांजपथक, युद्धकला, काठी चालवणे, महिलांच्या फुगडी -रिंगण कला अनेकांनी सादर केल्या. शेकडो फेटेधारी महिला यात सहभागी झाल्या होत्या. यशस्वीतेसाठी सुनिल जाधव, बाळासाहेब यादव, सुधाकर गायकवाड, नरहरी वाघ, नवनाथ जाधव, बालाजी मोहिते, गजानन जोगदंड, गजानन सोळंके, गोपाल भुसारे, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, प्रभाकर लिखे, तुळशीराम दळवे, साहेब शिंदे, श्याम गाडेकर, पांडुरंग शिंदे, सुनिता यादव, सुनिता चापके, किरण काळे, डॉ. मीनाक्षी पाटील यांनी परिश्रम घेतले.
अभिवादन रॅलीने सुरूवात
परभणी जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित मराठा सेवा संघाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय महाअधिवेशनाला महापुरुष अभिवादन रॅलीने शुक्रवारी (२३ डिसेंबर) उत्साहात सुरुवात झाली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.