आनंदयात्री : प्राचार्य डी.आर.कुलकर्णी

आनंदयात्री : प्राचार्य डी.आर.कुलकर्णी

हरेक घडीचा उत्सव करणारा चिरतरूण संस्कारयात्री

बाबासाहेब हेलसकर, सेलू जि.परभणी

मराठवाड्यातील आदराच्या प्रांतात कायम वावर असणार्‍यांपैकी, परभणी जिल्ह्यातील सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी चिटणीस आणि नूतन महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डी.आर.कुलकर्णी सर यांचे नाव अभिमानाने पुढे येते. हैदराबाद मुक्ती लढ्यातील अग्रणींचा सहवास, मराठवाडा विद्यापीठ, कृषी विद्यापीठ आणि नवनवीन महाविद्यालयांच्या स्थापना. त्यामुळे मराठवाड्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्थेत झालेल्या धोरणात्मक स्थित्यंतरानंतर शिक्षणाने टाकलेली कात. या व अन्य शैक्षणिक प्रयोगशीलतेचा एक भाग आणि सक्रिय साक्षीदार राहिलेले प्राचार्य डी.आर.कुलकर्णी. मराठवाड्याचे शैक्षणिक क्षेत्र आपल्या अतुलनीय योगदानाने अर्ध्याशतकाहून अधिक काळ समृद्ध करणारे,’डीआर’ सर, रविवारी २२ जानेवारी रोजी नव्वदी पुढच्या प्रवासावर मार्गस्थ झालेले आहेत.
सरांचा आजवरचा जीवन प्रवास चाळतांना आणि अनुभवतांना, तो मूल्याधिष्ठित कृतीप्रवणतेचे मूर्तीमंत प्रतीक ठरणारा तर आहेच. पण, मर्यादित परिघातच नव्हे, तर त्याही पलिकडे जाऊन, व्यक्ती आणि संस्थांच्या जीवन कार्यात चैतन्याचा दीपस्तंभ ठरत आलेला आहे.

एक…
सर, शिक्षण आणि समाजाच्या विविध क्षेत्रात कायम एकरस आहेत. सहचार्य धर्म परिश्रमपूर्वक, सेवाव्रतीने जपणार्‍या, सरांच्या पत्नी दुर्गाताई यांनी साडे पाच वर्षांपूर्वी, ‘डीआर’ पटातून एक्झिट घेतली. ‘सावली’ वाचून मनाच्या अवस्थेची घालमेल, पांथस्थांनाही विचारावी का? मग, एखाद्याच्या जीवनातून ‘आत्मसावली’चं ‘अस्तित्वच’ हरवलं, तर मनाची अस्वस्था काय होईल ? असा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो. पण, ‘डीआर’ सरांना ही नाजूक पोकळी भरतांना, मन:स्थितीच्याही कैक सीमा अलगदपणे ओलांडायला जमलेल्या  आहेत. त्या केवळ नि केवळ ताईच्या माघारी सरांनी जागृत ठेवलेली आत्मविश्वासाची सजगता, आत्मभान, स्व-शोधाची तृप्ती यामुळेच. तेंव्हाच तर त्यांच्या संवादात कमालीची संवेदनशीलता, आत्मियता आणि आपुलकीचा सुसंवाद घडतांना प्रत्येकाला अनुभवाला येत असतो.

दोन…
तसं पाहिलं, तर कौटुंबिक जीवनात लौकिकार्थाने कशाची उणीव भासत असते हो ?  म्हणतात ना ‘ मन के नैन हजार.’  परंतु; हा मनमनाभव ज्याच्या त्याच्या शिस्तीनेच शेवटी कृतीप्रवण होत असतो. सरांच्या ठायीची ही शिस्त काया, वाचा, मन, बुद्धी आणि कार्याच्या शुद्धतेची असावी, असेच वाटून जाते. सकार-स्वीकार वृत्तीची दृढमूलता सत् कृतीत आणल्याने आणि ती श्रद्धेला जोडल्याने, नव्वदी ओलांडलेला हा स्फूर्तीनिर्झर कायम प्रवाहीनी ठरणारा आहे. समाज,  कुटुंबियांशी एकरुप एक ‘आनंदयात्री’ म्हणून जीवनाला सद्विचाराने सजविण्याचा ‘डीआर’ सरांचा दृष्टिकोन म्हणूनच सर्वांसाठी अनुशील म्हणावा लागेल.

तीन..
भिन्न जिवात्म्यांचे पती-पत्नी, एकजीव होण्याची, जी एक आत्मभाव अवस्था निर्माण होत असते ? ती जपण्यापलिकडे समृद्ध, शुद्ध करावी लागते. नाही तर ‘तिच्या’ वा ‘त्याच्या’ अस्तित्वाचं रीतेपण, म्हणजे मनाच्या  ‘त्या’ भावास्थेची, बद्धतेची शून्यताच नाही?  हा अनुभवातीत प्रवास करणं, सोपं मूळीच नाही. पण, तो अवघड करून जगण्यातला आनंद घालविणे हे अर्थातच कितपत बरं म्हणावं. नीती मूल्यांच्या रेघांनी जीवनाचं सुंदर आकारांकण करावं लागतं. ज्यांना हे जमतं, ती माणसं ग्रेटच म्हणावीत. आपल्या ऐकण्या-वाचण्यात अशा कितीतरी थोर व्यक्तीही, ‘तिच्या’ वा ‘त्याच्या’ उणीवेने क्षणभर, काही काळ म्हणा, डगमगल्या असतीलच. परंतु; खचलेल्या खचितच नाहीत. उलट  पिचलेल्या, टिचलेल्या, भेदरलेल्या मनांमध्ये स्वाभिमानाच्या पराक्रमाचा हुंकार भरत, एक अनोखा प्रवास त्यांनी इतिहासबद्ध करून ठेवलाय. असेच दाखले आपल्याला मिळतील. पण, बदलत्या एकूणच ऐहिक परिस्थितीत, ‘ति’च्या वा ‘त्या’च्या शिवायचा प्रवास, हा निव्वळ कायेपुरता कदाचित मर्यादित असू शकतो. परंतु; ज्यांनी आपले उभे आयुष्य ‘स्व’च्या जाणीवेने वेचले आहे. त्यांच्यासाठी तो निश्चितच सातत्याने आनंद शोधणारा ठरत असतो. ‘डीआर’ सरही कायम या आनंदवारीतील वारकर्‍यांसमान अनुभवातीत अनुभव गोळा करत आलेले आहेत. इतरांचा नव्हे, स्वतःचा दररोजचा धांडोळा सरांना सहज घ्यायला जमत असावा, असाच अनुभव हेच देऊन जातो.

चार…
मान, सन्मान, पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती आदी कार्यकर्तृत्वाची बाह्यांगे. ती मिळवावी आणि कमवावीही लागतात. शिवाय परिस्थितीला स्वीकारुन प्रसन्नतेने जपावीही लागतात. पण, चरित्र आणि चारित्र्य टिकवून ठेवण्यासाठीची यात्रा पवित्रच असावी लागते. हे किमान उमगलं, की माणुसकीचा धर्म शाबूत राहतोच. स्वभाव-विभावालाही तो नियंत्रित करत असतो. ‘डीआर’ सरांच्या आसपासच नव्हे,अंतर्मनात यापेक्षा वेगळ्या विचारांना जागा नसाव्यात. कैक शाब्दिक उपाध्यांनाच खर्‍या अर्थाने सन्मान मिळवून देण्यात माणसाचं मोठेपण सिद्ध होत असतं. ते ‘डीआर’, ‘दरा’ उच्चारणातूनही अनुभवताही येतं. मनाची एकाग्रता, शांती, समाधान, सेवाभाव यांच्या तालीमीमधील अक्षरसंसारात, आत्मचित्त वृत्तीचा सुगंध आपसुकच दरवळत राहातो. अनेकविध क्षेत्रातात आव्हानांना सामोरे जातांना, निर्धारी ध्येयानिष्ठांना नैतिकता आणि सचोटीची साधना यांना माध्यम बनवून पवित्रता जपावी लागते. ही जाणीव नेणीव असली, की अनुभवाची सहजता येते. ‘डीआर’ सरांच्या जीवन यात्रेतील सार्‍या वाटाही जणू इथूनच अलगद जात असाव्यात. परस्परांशी क्षणभर का होईना गुज साधून, उमेद लहरीत रुपांतरीत होत असाव्यात. नाही तर, ताईंच्या माघारी, एका नाजूक मन:स्थितीशी झुंजण्याचं आत्मबळ, ‘डीआर’ सरांना कोठून मिळालं असतं ?

सतत मागे वळून पाहताना, हरेक घडीचा उत्सव करणारा, हा चिरतरूण संस्कारांचा आनंदयात्री, असाच कायम बोलत राहावा, अशी ‘त्या’ उच्चशक्ती, भगवंताला प्रार्थना. सरांना दीर्घ आयुरारोग्य लाभो, हेच अभीष्टचिंतन..! मनोमन सदिच्छा..!

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!