प्रवचनमाला : श्रममूल्याचा संस्कार गरजेचा : चैतन्य महाराज देगलूरकर
पसायदान प्रवचनमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, सेलूतील वसंत प्रतिष्ठानचा उपक्रम, शुक्रवारी दुसरा दिवस
सेलू जि.परभणी : समाजाला विचारांच्या दृष्टीने सजग बनवयाचे असेल, विकासाची दृष्टी ठेवून त्या दिशेने पुढे न्यायचे असेल, तर त्याला कष्टाविना अन्य माध्यमांचा उपदेश करणे हे त्याच्या विकासाच्या दृष्टीने सर्वथैव्य चुकीचे आहे. म्हणून संतांनी व्यापक अर्थाने विचार मांडले. अप्राप्त वस्तू प्राप्त झाल्यानंतरही तिचा आनंद टिकून राहिणे आवश्यक आहे. परंतू तसे होतांना दिसत नाही. कष्टाने मिळविलेल्याचे मूल्य जाणले पाहिजे. श्रममूल्याचा संस्कार आवश्यक आहे, असे प्रतिपादन चैतन्य महाराज देगलूरकर यांनी गुरूवारी ( सहा एप्रिल ) येथे केले.
येथील वसंत प्रतिष्ठान व खारकर परिवाराच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘पसायदाना’वरील चिंतनात्मक प्रवचनमालेत चैतन्य महाराज बोलत होत. प्रवचनमालेचे हे चौथे वर्ष आहे. या वेळी पुरुषोत्तम महाराज वालूरकर, उद्योजक तथा श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेश खारकर, विधीज्ञ उमेश खारकर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी आमदार विजयराव भांबळे , जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोकराव काकडे, के.बा.विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर, मारोती महाराज वाघ, मंचकराव वाघ, हेंगडे गुरुजी, दत्तराव पावडे, भगवान महाराज डासाळकर आदींनी संत पूजन केले. कार्यक्रमाची सुरुवात यशवंत चारठाणकर यांनी गायीलेल्या ‘समाधी साधन संजीवन नाम’ या पदाने झाली. शिवाजी पाठक यांनी तबला, तर शंतनू पाठक यांनी हार्मोनियमवर, तसेच प्रकाश सुरवसे यांनी साथ संगत दिली. प्रवचनमालेला श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
चैतन्य महाराज म्हणाले, की संत ज्ञानेश्वरांनी मागितलेले पसायदान हे मानवी जीवनाला मिळालेले अमृत आहे. संतांनी नेहमी साध्याची मागणी न करता साधनांची मागणी केलेली आहे. विनासायस मिळाल्याची किमंत राहात नाही. समाजाला प्रगतिशील व सजग बनवायचे असेल, तर कष्टाचे मूल्य जाणता आले पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय महाराज पिंपळगावकर यांनी केले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
साईबाबा मंदिरात शुक्रवारी (सात एप्रिल) व शनिवारी ( आठ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता प्रवचनमालेला सुरूवात होणार आहे. शुक्रवारी चैतन्य महाराज पसायदानातील ‘ दुरितांचे तिमिर जावो…’ ओवीचे चिंतनात्मक निरूपण करणार आहेत. श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.