मरणाचाही सोहळा व्हावा : चैतन्य महाराज देगलूरकर; प्रवचनमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मरणाचाही सोहळा व्हावा : चैतन्य महाराज देगलूरकर; प्रवचनमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वसंत प्रतिष्ठानचा उपक्रम, साईबाबा मंदिरात आयोजन, आज सांगता

सेलू जि.परभणी : जन्म आणि मरण यातील कालावधी म्हणजे जीवन. या साठी जन्म मृत्यूचा सोहळा महत्त्वाचा आहे. परंतु ज्याप्रमाणे जन्माचा सोहळा होतो. अगदी त्याचप्रमाणे मरणाचादेखील सोहळा व्हावा, अशा सामर्थ्यशाली जीवनाची शिकवण संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानामधून मिळते, असे प्रतिपादन चैतन्य महाराज देगलूरकर यांनी शुक्रवारी, ७ एप्रिल रोजी केले. 

‘दुरितांचे तिमिर जावो’ या वर विवेचन करतांना चैतन्य महाराज बोलत होते. महाराज म्हणाले, की जीवनातील पापाने निर्माण होणारा अंधकार नष्ट व्हावा. अज्ञानरूपी अंधकार दूर व्हावा, अशी व्यापक व वाजवी मागणी संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून केली आहे. प्रत्येकाने जे योग्य आणि शक्य आहे असेच काम केले, तर संतांना अपेक्षित मनुष्य जीवन साकार होईल. आम्ही पाप का करतो ? माणसाच्या जीवनात पापाचे शंभर कारणे आहेत. त्यातील प्रमुख कारणे म्हणजे अज्ञान, प्रमाद व सदोष प्रारब्ध. मनुष्य जे कर्म करतो त्याचे फळ त्याला भोगावेच लागते. मनुष्य जो पाप करतो त्या पापाचा अंधकार भूत, भविष्य, वर्तमान या तीनही काळात कायम राहतो. सुख मिळवायचे असेल तर सदाचार व सदाचरण असावे. सत्कर्म आणि दूरीत एकमेकांचे विरोधक आहेत. सत्कर्मामध्ये प्रेम निर्माण व्हायचे असेल, तर पाप आणि पापाचा अंधकार दूर होणे गरजेचे आहे. कारण अंधकारांमध्ये काम, क्रोध, विंचू, काटे, साप, सिंह हे माणसाला नष्ट करू शकतात. अंत:करणात पापाचा अंधकार राहील तोपर्यंत काम, क्रोध हे आमच्यासाठी वैरीच आहेत. पापाचा अंधकार जावा आणि अंधार गेला, की स्वधर्माचा सूर्य या विश्वाने बघावा. हीच जगाच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानातून मागणी केली आहे.

प्रारंभी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, आयोजक महेश खारकर, विधीज्ञ उमेश खारकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, योगेश महाराज साळेगावकर, उद्योजक जयप्रकाश बिहाणी, उद्योजक नंदकिशोर बाहेती, वासुदेवराव थोरात, अशोक फोपसे,  गोविंदराव शेळके, ,संतोष देशमुख, जगताप महाराज, ,डॉ.कैलास आवटे, जयसिंग शेळके आदींनी संत पूजन केले. मी वारकरी आगळा संचाच्या गायीलेल्या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा.संजय पिंपळगावकर यांनी सूत्रसंचालन केले. शनिवारी, ८ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता प्रवचनमालेचा समारोप आहे. श्रोत्यांनी उपस्थित राहावे , असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


प्रवचनमाला : श्रममूल्याचा संस्कार गरजेचा : चैतन्य महाराज देगलूरकर

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!