महाप्रबोधन यात्रा : मोदी सरकारवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल; भाजपच्या नीतीवर जोरदार टिकास्त्र
परभणी येथील महाप्रबोधन यात्रेत चित्रफिती, व्हिडीओ फिती दाखवत सुषमा अंधारेंचा हल्ला
परभणी : शिक्षण, आरोग्य, महागाई, बेरोजगारी, महिला, शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाला काही विचारायचे नाही. जनतेच्या पैशातून मोदींच्या जाहिरातबाजीवर अमाप उधळपट्टी केली जात आहे. ‘ह्याचं उत्तर द्या ‘ असा सवाल करीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या गलिच्छ राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला.
महाप्रबोधन यात्रेनिमित्त शुक्रवारी ( ७ एप्रिल) सायंकाळी परभणी येथे अंधारे यांची जाहीर सभा झाली. या वेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहूल पाटील, उध्दव भवर, डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, सखुबाई लटपटे, अंबिका डहाळे, अनिल डहाळे, अर्जुन सामाले, दीपक बारहाते, संजय सारणीकर, मारोती बनसोडे, पंढरीनाथ धोंडगे, मंगल कथले आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
विविध चित्रफित व व्हिडिओ दाखवत सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपकडून विरोधकांची प्रतिमा मलीन केली जात आहे. सुरूवातीला एखाद्याची टिंगल करायची. नंतर उपहासात्मक बोलायचे, एवढे करूनही जमले नाही तर, फोटो मॉर्फिंग करून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करीत गलिच्छपणे चरित्रहननाचे राजकारण केले जाते आहे. नेहरू-गांधी घराण्याचे आणि महाराष्ट्रातही अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राउत यांचे चरित्रहनन करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्यानंतर भाजपने मोर्चा माझ्याकडे वळवल्याचे अंधारे म्हणाल्या. शेतमालाला भाव नाही, अवकाळीचे पंचनामे बाकी आहेत. पीक विमा मिळत नाही. महागाईचा दर साडेनऊ टक्क्यावर गेला आहे. अनेक प्रकल्प परराज्यात पाठवले जात आहेत. राज्यात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. यावर यांना कुणी विचारायचे नाही. जनतेच्या पैशावर मोदी स्वतःचा उदो उदो करून घेत आहेत, अशी टीका अंधारे यांनी केली.
परभणी हा शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळून देणारा जिल्हा आहे. पक्षाशी आपण कधीही प्रतारणा करणार नसून शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार, असे खासदार संजय जाधव या वेळी म्हणाले. प्रास्ताविक जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी केले.