विनातक्रार जीवनाचा आनंद घ्या : चैतन्य महाराज देगलूरकर; प्रवचनमाला उत्साहात
वसंत प्रतिष्ठानचे आयोजन : विविध क्षेत्रातील मान्यवर व श्रोत्यांची मोठी उपस्थिती
सेलू (जि.परभणी) : येथे आयोजित चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या तीन दिवसीय पसायदान प्रवचनमालेला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी बोलतांना चैतन्य महाराज म्हणाले, की व्यक्तीपेक्षा वृत्ती परिवर्तन आणि आहे ती परिस्थिती स्वीकारून, स्वधर्माचे आचारण व्हावे. प्रत्येकाने विनातक्रार जीवनाचा आनंद घ्यावा, याची शिकवण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदान आणि संतवचन वाङमयातून मिळते.
वसंत प्रतिष्ठान व खारकर परिवाराच्या वतीने गुरुवार ते शनिवार (६ ते ८ एप्रिल) या कालावधीत साईबाबा मंदिर सभामंडपात ही प्रवचनमाला झाली. प्रवचनमालेचे हे चौथे वर्ष होते. यानिमित्ताने संयोजक महेश खारकर, विधीज्ञ उमेश खारकर, रामप्रसाद घोडके आदींसह विविध मान्यवरांनी संत पूजन केले. ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो’ यावर चैतन्य महाराज देगलूरकर यांनी विवेचन केले. समारोपप्रसंगी चैतन्य महाराज म्हणाले, संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात एका व्यक्तीची नव्हे, तर सकळ मानव जातीच्या कल्याणाची मागणी केली आहे. विषय, विकार, अज्ञानाचा अंधकार मानवाला सन्मार्गापासून भुलवितो. त्यामध्ये गुरफटलेला मनुष्यजीव सांसारिक सुखाला अंतिम सुख मानतो. परंतु; यापलीकडेही खरे जीवन आहे. याची जाणीव व्हावी. व्यक्तीपेक्षा वृत्ती परिवर्तन व्हावे. आहे ती परिस्थिती स्वीकारून, स्वर्धमाचे आचारण व्हावे. प्रत्येकाने विनातक्रार जीवनाचा आनंद घ्यावा, याची शिकवण पसायदान आणि संतवचन वाङमयातून मिळते.
या वेळी नामदेव महाराज ढवळे चारठाणकर, रामकिशन आबा सोळंके, विनायक महाराज पाटांगणकर यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले. अंकिता खारकर यांनी आभार मानले. उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी आमदार विजय भांबळे, साईबाबा बॅंकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, सभापती अशोक काकडे, उद्योजक जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, मुकेशराव बोराडे, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर आदींसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश खारकर, डॉ.शरद कुलकर्णी, उमेश खारकर, श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या शिक्षकांनी पुढाकार घेतला.
इंद्रियांचे भोग पुरविण्यासाठी केलेली प्रत्येक कृती ही पापाची निर्मिती करणारी ठरते. माणसाचा विनाश टाळण्यासाठी काम, क्रोध, विषय विकाररूपी अंधकाराची निवृत्ती होणे गरजेचे आहे. प्रकाशाची प्राप्ती झाल्यावरच अंधकाराची निवृत्ती होऊ शकते. सगळा अंधार जाण्यासाठी सूर्य उगवला पाहिजे तसेच; हृदयातील पूर्ण अंधार जायचा असेल तर, स्वधर्म सूर्य उदयाला येणे गरजेचे आहे. स्वधर्माने पापाची निवृत्ती होते. अधर्म हेच पापाच्या उत्पत्तीचे प्रमुख कारण असल्याचे चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले.