नरसापूर,जयपूर एक्स्प्रेसला सेलू स्थानकावर थांबा द्या
प्रवासी संघातर्फे रेल्वे प्रशासनाला निवेदन
सेलू, जि.परभणी : अजंता, साई नगर शिर्डी एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांचा करोना काळात बंद करण्यात आलेला सेलू (जि.परभणी) स्थानकावरील थांबा पूर्ववत करावा तसेच नरसापुर आणि जयपूर साप्ताहिक एक्स्प्रेसला नवीन थांबा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी संघातर्फे रेल्वे प्रशासनाकडे सोमवारी ( १७ एप्रिल) करण्यात आली आहे.
नांदेड विभागाच्या रेल्वे व्यवस्थापक नीता सरकार यांना याबाबत निवेदन देण्यात आले. या वेळी प्रवासी संघाचे रमेश काला, विजय मंत्री, व्यंकटेश काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती. निवेदनात म्हटले आहे की, सेलू शहर हे ६० हजार लोकवस्तीचे तालुक्याचे ठिकाण आहे. परिसरातील १२५ ते १५० गावांसह पाथरी, मंठा, मानवत रोड, जिंतूर या तालुक्यातील नागरिक रेल्वे प्रवासाला सेलू स्थानकावरून सुरुवात करतात. यातून वार्षिक सुमारे पाच कोटी रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळत आहे. अजुन काही
एक्स्प्रेस गाड्यांना थांबा दिला तर उत्पन्नात निश्चितच वाढ होईल. हैदराबाद-जयपूर साप्ताहिक एक्सप्रेस गाडी क्रमांक क्रमांक १७०१९-२० आणि नगरसोल-नरसापूर एक्सप्रेस गाडी क्रमांक १७२१३-१७२१४ या गाडीला सेलू येथे थांबा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच; अजंता व साईनगर शिर्डी एक्स्प्रेसचा करोना काळात बंद झालेला थांबा पूर्ववत सुरू करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर उद्घोषण करा
रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांचे उद्घोषण करतेवेळी औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा नामोल्लेख करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.परभणी जिल्हा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी, मनोज देशमुख आदींनी या संदर्भात परभणी रेल्वे स्थानक प्रबंधकांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
हेही वाचा : वालूर, दरेवाडीची बारव पोस्टकार्डवर; सीपीएमजींनी मुंबईत अंतर्देशिय पत्रावरही उमटविली मोहर