देवाच्या इच्छेनुसार जगा, जीवन नितांत सुंदर; सेलूतील ब्रह्माकुमारी केंद्राचे सौहार्द सम्मेलन उत्साहात
ब्रह्माकुमारी विद्यालयाचा 30 वा वर्धापन दिन : सर्वधर्मीय मान्यवरांची उपस्थिती
सेलू (जि.परभणी) : येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्राचा ३० व्या वर्धापनदिनानिमित्त सर्वधर्मीय सौहार्द सम्मेलन रविवारी (२३ एप्रिल) उत्साहात साजरे झाले. आपापसांत प्रेम, शांती, सौहार्दाचे वातावरण राखणे अत्यंत गरजेचे असून, ह्यातच समस्त् मानवजातीचे कल्याण आहे. स्वत:च्या नव्हे, तर देवाच्या इच्छेनुसार जगा, जीवन नितांत सुंदर आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश उपस्थिती सर्वधर्मीय मान्यवरांनी या वेळी दिला.
या वेळी जमाते उलामे-ए-हिंदचे परभणी जिल्हाध्यक्ष मौलाना सादेकभाई, देवगावफाटा आम्रवन महाविहारचे भदन्त संघरत्न, भागवताचार्य संजय पिंपळगावकर महाराज, परभणीचे फादर रेव्हरन्ट एम.कसबे, काँग्रेसचे परभणी जिल्हा सरचिटणीस मिलिंद सावंत, ब्रह्माकुमारी सुमनदीदी, ब्रह्माकुमारी सवितादीदी, ब्रह्माकुमारी वैशाली दीदी, सीमा दीदी, राधा दीदी, सारिका दीदी, इंजिनिअर बी.एस.कोलते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलतांना सुमनदीदी म्हणाल्या, की ब्रह्माकुमारी केंद्रातील राजयोग ज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येकांने स्वधर्माचरण व स्वचिंतनाने स्वपरिवर्तन घडवून आणण्याची गरज आहे. सर्वच धर्मामध्ये मानवाचे कल्याण, सुख, शांती आणि प्रेमाचा संदेश दिला आहे. त्याचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे, असे विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले. प्रारंभी ईश्वरीय स्मृती व दीपप्रज्वलन झाले. वर्धापनदिनानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक मीठास कार्यक्रम झाला. नम्रता मिटकरी या चिमुकलींनी स्वागत नृत्य सादर केले. उपस्थित मान्यवरांनी ईश्वरीय सौहार्द संदेश दिला. प्रास्ताविक केंद्रसंचालिका ब्रह्माकुमारी सविता बहेनजी, सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी सीमा बहेनजी यांनी, तर ब्रह्माकुमारी राधा बहेनजींनी आभार मानले. कार्यक्रमाला सेलू, वालूर, शिंदे टाकळी, सातोना परिसरातील नागरिक, महिला, ब्रह्माकुमारी परिवाराची मोठी उपस्थिती होती.
सेलू येथील ब्रह्माकुमारी केंद्राच्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सौहार्द सम्मेलनात बोलतांना भदन्त संघरत्न म्हणाले, जीवनातून अज्ञानाला घालवून काही तरी चांगले करण्यासाठी सर्वांनी सदैव तत्पर राहावे. मिलिंद सावंत म्हणाले, की ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या माध्यमातून मानसिक सुख, शांती, समाधान यासाठी राबविले जाणाऱ्या विविध उपक्रमांचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे. मौलाना सादेक म्हणाले, देशामध्ये शांती आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी ब्रह्माकुमारी परिवार मोठे योगदान देत आहे. सद्यस्थितीत देशाला याची नितांत गरज आहे. संजय पिंपळगावकर म्हणाले, धर्म म्हणजे सत्य. सर्वच धर्म ग्रंथात सौहार्दाचे वातावरण समृद्ध व्हावे, प्राणीमात्र, मनुष्याचे कल्याण व्हावे, याचेच विवेचन केले आहे. तर फादर रेव्हरंड एम.कसबे यांनी सर्वच धर्म शांती, एकता आणि प्रेमाची शिकवण देतात. त्यासाठी स्वतःच्या नव्हे, तर देवाच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला तर जीवन नितांत सुंदर आहे. याचीच जाणीव होते.