‘कविता मिरगाच्या’ : बहारदार काव्य मैफलीने भारावले श्रोते; सेलूकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

‘कविता मिरगाच्या’ : बहारदार काव्य मैफलीने भारावले श्रोते; सेलूकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

शब्दसह्याद्री, अक्षर प्रतिष्ठान व सेलू नागरी सहकारी पतसंस्थेचा सांस्कृतिक उपक्रम 

सेलू जि.परभणी : येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान आणि स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी ( सात जून) रोजी आयोजित ‘ कविता मिरगाच्या कविता मिरगाच्या कविता मिरगाच्या ‘ या नवव्या वर्षातील बहारदार काव्य मैफलीत सादर झालेल्या कवितांनी रसिक श्रोते भारावून गेले. काव्य मैफलीचे सूत्रसंचालन करणारे गेवराई येथील कवी डॉ.समाधान इंगळे शेतकऱ्यांची वेदना आपल्या कवितेतून व्यक्त करताना म्हणतात, ” अंधारात तो गोठ्यात निजतो, तुम्हाला तुपाचा दिवा, शाळेत पोट्ट, ढोरामागे जातंय अनवानी पायाने जवा, तीळतीळ तुटतय काळीज पाहून, लाहीलाही त्याच्या जीवा, आमचं फ्युचर रानावनातून, आपलं करिअर घडवतंय, दुध डेरेला जातय…” माजलगावचे कवी प्रभाकर साळेगावकर यांनी सादर केलेल्या विडंबन काव्याने रसिकांची मने जिंकून घेतली. ते आपल्या कवितेत म्हणतात ,” वरी ढगात ढग डुचमळ,

खाली उन्हाचं वाढतय बळ, हे बघुन रान माझं जळं, किती जिवानी सोसावी झळ, कशी ढगाला येईना कळं, पाणी कुण कडं पळं.” छत्रपती संभाजी नगर येथील कवयित्री आशा डांगे आपल्या कवितेत म्हणतात, ” माझ्या मनी ही निळाई, तुझी साथ सोनसळी, दारी घुमतो हा पारवा, तू पाऊस रे मिरगाचा. ” अहमदनगर येथील कवी डॉक्टर संजय बोरुडे आपल्या भावना कवितेतून व्यक्त करताना म्हणतात, ” परवाच सरकारने त्याला’ वृक्षमित्र ‘ बहाल केला, त्याने तो, अंगणातल्या जंगलमातीत, खुशाल पुरुन टाकला आणि वर एक, अबोलीचे रोप, लावून टाकले. ” छत्रपती संभाजी नगर येथील कवी अभयदानी आपल्या कवितेत म्हणतात,” तो पाखरांच्या शवयात्रेला भरारी म्हणायचा, लढाया निर्णायक वळणावर आल्यावरही, त्याने नखं नाही वाढू दिली स्वतःची.” सुनील उबाळे यांनी आपली व्यथा कवितेत अशी व्यक्त केली,” लोकं भलेही लपवून ठेऊ द्या,सोनं टाळे बंद तिजोरीत, म्या खेळत्या वयात, भाकरीचे तुकडे लपवून ठेवले होते, उद्याची उपासमार टाळण्यासाठी.” कवयित्री रचना यांच्याही कवितेने श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. जिल्हा परिषद परभणीचे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) यांनी सादरीकेलेल्या वामनदादा कर्डक यांच्या कवितेने ‘कविता मिरगाच्या’ या काव्य मैफलीचा समारोप झाला. या काव्य मैफलीत शेतकऱ्यांची व्यथा, पर्यावरणाचे, पाणी बचतीचे महत्त्व, राष्ट्रीय एकात्मता, स्त्रियांच्या वेदना अशा विविध विषयांवरती कवींनी आपल्या कविता सादर करून रसिकांना भावनिक केलं, तर कधी त्यांच्या काळजाला हात घातला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांनी केले. स्वागतपर मनोगत स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाचे सचिव प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचलन माधव गव्हाणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश हिवाळे, शरद ठाकर, महादेव आगजाळ, आबासाहेब बिडवे, पंडित जगाडे, रमेश नखाते, डॉ. सतीश मगर यांनी पुढाकार घेतला.

 


शाहबुद्दीन बुरहानुद्दीन उरुस उत्साहात, सेलूत विविध कार्यक्रम

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!