छत्रपती शाहू महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज; सेलूतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयात अभिवादन कार्यक्रम
सेलू : येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी, २६ जून रोजी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी बोलताना, कल्याण पवार म्हणाले, ” छत्रपती शाहू महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची नितांत गरज आहे.”
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सांख्यिकी अधिकारी संजय विटेकर, ॲड. प्रधान, चव्हाण, ए.ए.शेख यांची उपस्थिती होती. कल्याण पवार म्हणाले, की प्रत्येकाने अंतर्मनात असणाऱ्या महत्वकांक्षा जपल्या पाहिजेत. कर्तव्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी कार्यतत्पर राहील पाहिजे. शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
संजय विटेकर म्हणाले, की जाती धर्मातील एकोपा टिकवितांना शाहू महाराजांची धर्मविषयक भूमिका अगदी स्पष्ट होती. ‘सायंटिफिक इंडिया ‘ ही संकल्पना स्वीकारताना आध्यात्मिक भारत ही संकल्पनाही स्वीकारली पण या दोन्ही संकल्पनाचा अतिरेक होऊ न देता त्याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. राष्ट्र ही संकल्पना लोककल्याणाशी जोडली. राज्य, राष्ट्र, धर्म, इतिहास, नागरी समाज या सर्वांचा शाहू महाराजांनी एकत्रित मेळ घातला. शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार होत असताना, तरुण वर्गापर्यंत हे विचार पूर्णपणे पोहोचण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. आधुनिक भारतीय राज्यसंस्थेची स्थापना हा ‘आयडिया ऑफ इंडिया’ संकल्पनेची सुसंगत असणारा विचार राजश्री शाहू महाराजांनी मांडला. याप्रसंगी ॲड. प्रधान, चव्हाण, ए.ए.शेख यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ग्रंथपाल महादेव आगजाळ, सूत्रसंचालन पंडित जगाडे, तर आभार विलास शिंदे यांनी मानले.