मुलांच्या आहारविहाराकडे पालकांनी लक्ष द्यावे : डॉ.अनुपमा जवळेकर; सेलूतील बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे गुणवंतांचा सत्कार
सेलू जि.परभणी : पालकांनी आपल्या मुलांवर शिक्षणाबाबत बळजबरी न करता, त्याची कुवत ओळखूनच शिक्षणाची दिशा ठरवावी. शिक्षणाबरोबरच मुलांना धार्मिक शिक्षण, रूढी, परंपरा ही जाणीव तसेच; मुलामुलींच्या आहारविहारकडे देखील आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत डॉ.अनुपमा जवळेकर यांनी व्यक्त केले.
सेलू येथील बहुभाषिक ब्राह्मण संघ आणि परशुराम जन्मोत्सव समिती यांच्या संयुक्त सहकार्याने ब्राह्मण समाजातील नीट, जेईई एमएचसीईटी तसेच; दहावी व बारावी मधील प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या सत्कार सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
सेलू येथील ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी डॉ.अनुपमा जवळेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, शुभंकरोती फाउंडेशन नांदेडचे अध्यक्ष किरण चौधरी, डॉ.अमित कुलकर्णी, युवा उद्योजक अनुप कान्हेकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. भगवान परशुराम, माता सरस्वतीचे पूजन, दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी बोलताना किरण चौधरी यांनी स्पष्ट केले, की ब्राह्मण ही एक केवळ जात नसून एक विचारधारा आहे समाजातून व कुटुंबाकडून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे जडणघडण होत असते आपल्याला मिळालेल्या वेळेचा योग्य सदुपयोग व मनातील जिद्द हीच आपले भाग्य ठरवते. यावेळी अमित कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले. नूतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी म्हणाले, ” माणसाची खरी संपत्ती ही गुणवंत व संस्कारित मुलेच आहेत.”
गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अहोरात्र सेवा देणारे सचिन सावंगीकर यांचा देखील सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन व प्रस्ताविक विजय चौधरी यांनी केले, तर गजानन मुळी यांनी आभार मानले. भागवताचार्य संजय पिंपळगावकर, योगेश महाराज साळेगावकर यांच्यासह पालकांची उपस्थिती होती.
छत्रपती शाहू महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज