समर्पित नेतृत्वच समाजाला योग्य दिशा देते : साध्वी अनुराधा दीदी; कासार समाजाचे माजलगाव अधिवेशन उत्साहात
राज्यभरातील कासार समाज बांधव, महिलांची मोठी उपस्थिती; विविध ठरावांवर आवाजी मतांची मोहोर
बाबासाहेब हेलसकर…
परभणी : अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाच्या मध्यवर्ती मंडळाचे सतरावे अधिवेशन बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे रविवारी (९ जुलै) उत्साहात पार पडले. या वेळी उद्घाटक साध्वी अनुराधा दीदी म्हणाल्या, की सदाचार, निस्वार्थपणा, प्रजा हितैशीता, नितिमत्ता या गुणांनी युक्त नेतृत्व खर्या अर्थाने रामराज्य निर्माण करीत असते. प्रेम आणि समर्पित नेतृत्व लाभलेल्या समाजाच्या विकासाची वाटचाल अधिक समृद्ध होत राहाते.”
माजलगाव येथील स्व.वंदना सुभाष दगडे सभागृहात भागवताचार्य साध्वी अनुराधा दिदी यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरद भांडेकर, स्वागताध्यक्ष रोहीदास पाटील गाडेकर, छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर बापूसाहेब घडामोडे, विनायक महाराज अष्टेकर, श्रीकांत धुमाळ महाराज, कमलताई दहातोंडे, डबीर महाराज, महिला अध्यक्ष स्मिता धारूरकर, प्रा.सुभाष दगडे, चंद्रकांत सरोदे, गोविंद अंधारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्ष शरद भांडेकर यांनी, अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देत मनमोकळा संवाद साधला. गेल्या शंभर वर्षांत कासार समाज मध्यवर्ती मंडळाच्या माजी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परिने समाजाच्या विकासासाठी योगदान दिले आहे, असे कृतज्ञतापूर्वक नमूद केले. यापुढे कासार समाजाच्या विकासाची चळवळ सर्वांच्या मार्गदर्शन व सहकार्याने अधिक गतीमान व व्यापक करण्यासाठी प्रयत्नरत राहू. सकारात्मक विचाराने आणि एकजुटीने पुढे जावू, असा विश्वास भांडेकर यांनी या वेळी दिला. बापूसाहेब घडामोडे, स्मिता धारूरकर यांनीही यावेळी विचार मांडले. अधिवेशनात प्रा.सुभाष दगडे व चंद्रकांत सरोदे यांनी मांडलेले घटना दुरूस्तीसह अन्य ठरावांना उपस्थितांनी आवाजी मताने व हात वर करून मंजुरी दिली. प्रारंभी संत आडकोजी महाराज पालखी पूजन व भवानी ज्योत प्रज्वलित करण्यात आली. प्रास्ताविक अरूण वेळापुरे यांनी केले. सूत्रसंचालन निशिकांत धुमाळ व किरण जवकर यांनी केले. सामूहिक पसायदानाने अधिवेशनाची सांगता झाली. मोहन डांगरे, अनिल नागपुरकर, डॉ.किरण झरकर, नागनाथ पाथरकर, चंद्रकांत शेटे आदीसह मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच; मराठवाडा, कोकण, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील कासार समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी बीड, माजलगाव, शिरूरकासारसह विविध ठिकाणच्या समाज बांधवांनी पुढाकार घेतला.
अधिवेशनस्थळी प्रवेशद्वारावर ‘मी कासार, माझा कासार’ अशा आशयाचे बॅनर अंगात घालून व डोक्यावर बांगडीचे कट्टे घेऊन सांगली जिल्ह्यातील संतोष भिवरेसह समाजबांधवांनी लक्ष वेधून घेतले होते. यानिमित्ताने विविध परीक्षेतील गुणवंतांचा ,स्पर्धेतील विजेत्यांचा, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
गेल्या शंभर वर्षांत कासार समाज मध्यवर्ती मंडळाच्या माजी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परिने समाजाच्या विकासासाठी योगदान दिले आहे, असे अध्यक्ष शरद भांडेकर यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले. कासार समाजाच्या विकासाची चळवळ सर्वांच्या मार्गदर्शन व सहकार्याने अधिक गतीमान व व्यापक करण्यासाठी प्रयत्नरत राहू. सकारात्मक विचाराने आणि एकजुटीने पुढे जावू, असा विश्वासही शरद भांडेकर यांनी या वेळी दिला.