मुलींनो, हिंमतीने लढायला शिका : ॲड.माधुरी क्षीरसागर यांचे आवाहन; सेलूतील मुलींच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद
सेलू महिला मंडळ व गटसाधन केंद्राच्या वतीने आयोजन; विविध मान्यवरांनी साधला मनमोकळा संवाद
सेलू जि.परभणी : बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलींनी स्वतःला ओळखून, स्वतःला घडविण्यासाठी, स्वावलंबी व आनंदी जीवनाची कौशल्ये आत्मसात करावीत. शिक्षणाद्वारे मिळणाऱ्या संघर्षशक्तीतून स्वसंरक्षणासाठी हिंमतीने लढायला सदैव तैयार राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या ॲड.माधुरी क्षीरसागर यांनी सेलू येथे केले.
सेलू (जि.परभणी) येथील महिला मंडळ व गटसाधन केंद्राच्या वतीने साईबाबा मंदिर सभामंडपात बुधवारी (१२ जुलै) शहरातील विविध शाळांतील किशोरवयीन मुलींसाठी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड.क्षीरसागर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे होते. नूतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, पोलिस निरीक्षक समाधान चवरे, महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया कोठेकर, चिटणीस ललिता गिल्डा, समन्वयक सुनीता काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड.क्षीरसागर म्हणाल्या, की मुलींनी अंतर्मुख होऊन मनाशी स्वसंवाद साधावा. मोबाईलाचा अतिवापर टाळून शिक्षणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे. समस्या व अडचणींविषयी पालकांजवळ मोकळेपणाने व्यक्त होणे गरजेचे आहे. नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी, शहरातील विद्यानगर भागातील नूतन कन्या शाळेजवळील पोलिस चौकीमध्ये पोलिस कर्मचारी उपलब्ध असण्याची गरज व्यक्त केली, तर मुलींना विनाकारण जाणूनबुजून कुणी त्रास देत असेल, काही अडचणी निर्माण झाल्या, तर शहरातील पोलिसांशी, तसेच ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. तक्रार करावी. तातडीने संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी नमूद केले. प्राचार्य कुलकर्णी यांनीही या वेळी मार्गदर्शन केेले. गेल्या काही वर्षामध्ये शहरात शिक्षण घेणाऱ्य़ा मुलींची संख्या वाढलेली आहे. ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने मुली शिक्षणासाठी विविध शाळा, महाविद्यालयात आहेत. मुलींनी नेहमी सकारात्मक राहावे, चांगल्या गुणांची जोपसना करावी, असे प्राचार्य कुलकर्णी यांनी या वेळी नमूद केले. सूत्रसंचालन मीरा देशमुख यांनी केले. सरिता उमरीकर यांनी आभार मानले. मेळाव्याला महिला मंडळाच्या रोहिणी कुलकर्णी, रजनी सुभेदार, सुरेखा वांबुरकर, संगीता खारकर, वसुधा खारकर, अनुपमा देवधर, अल्का धर्माधिकारी, रमा बाहेती, मधुरा खारकर यांच्यासह शहरातील विविध शाळांतील विद्यार्थींनीची मोठी उपस्थिती होती.
मुलींना विनाकारण जाणूनबुजून कुणी त्रास देत असेल, काही अडचणी निर्माण झाल्या, तर मुलींनी व महिलांनीदेखील शहरातील पोलिसांशी तसेच; ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर निर्भयपणे संपर्क करावा. तक्रार करावी. तातडीने संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी या वेळी सांगितले.
सेलू शहरातील किशोरवयीन मुलींचा जास्तीत जास्त वावर विद्यानगर भागात आहे. या भागातील पोलीस चौकी पुन्हा कार्यान्वित करण्याची गरज आहे. महिला मंडळाने या साठी पुढाकार घ्यावा. तसेच; पोलिस प्रशासनाने यामध्ये विशेषत्वाने लक्ष घालण्याची गरज मेळाव्याचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी या वेळी व्यक्त केली.
छायाचित्रे : सदाशिव महाजन, सेलू