विद्यार्थ्यांनो, करिअरसाठी पर्यायांचाही विचार करा : मनोविकारतज्ज्ञ डॉ.जगदीश नाईक
परभणीमध्ये बुद्धिमत्ता मापन व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेला मोठा प्रतिसाद, शारदा महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम
परभणी : करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मानसशास्त्रीय चाचण्या, बुद्धिगुणांक याद्वारे यशस्वी करिअर करता येते. परंतु, करिअर निवडतांना अपयश जरी आले, तरी विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. पर्यायांचाही विचार कारायला हवा, असे मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ.जगदीश नाईक यांनी व्यक्त केले.
येथील शारदा महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मानसशास्त्र विभाग व समुपदेशन कक्ष यांच्या वतीने करिअर गाईडन्स व बुद्धिमत्ता मापन कार्यशाळेचे रविवारी, २३ जुलै आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सदस्य डॉ. रामेश्वर नाईक, डॉ.जगदीश नाईक, अॅड.रमेश शर्मा, प्रल्हाद लाड, पशुधन विकास अधिकारी डॉ.बी.आर.पाटील, प्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे, प्रा.डॉ.संतोष नाकाडे, प्रा.ए.बी.टेकुळे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एन. व्ही.सिंगापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट प्रा.माणिक लिंगायत, सहाय्यक समुपदेशक अतुल वैराट, प्रतीक्षा कदम, रेणुका कल्याणकर, पल्लवी खांडे, जयकृष्ण पर्रे, मनीषा वाकळे, अनिता मिरगेवाड, कृष्णा पेदापल्ली यांनी बुद्धिमत्ता मापन व अभिरुची मापनाचे कार्य केले, तर प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ.जगदीश नाईक व प्रा.डॉ.एन.व्ही.सिंगापुरे, प्रा.डॉ. गोपाळ पेदापल्ली यांनी करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. बी.आर.पाटील यांनी अशा कार्यशाळा आजच्या काळाची गरज बनल्या आहेत, असे स्पष्ट करीत आपल्या अभिरुची व बुद्धिमत्तेप्रमाणे विद्यार्थ्याला करिअरची निवड करता आली, पाहिजे, असे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ.शामसुंदर वाघमारे यांनी लोकमान्य टिळक यांचे कार्य भारतीय इतिहासात अनमोल आहे, असे मत मांडून त्याच्या जीवन कार्यावर भाष्य केले. या कार्यशाळेमध्ये परभणी शहर, सेलू, परतूर, जिंतूर, वसमत, गंगाखेड येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
सूत्रसंचालन डॉ.एन.व्ही.सिंगापुरे यांनी केले, तर आभार डॉ.गोपाळ पेदापल्ली यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुरेश जयपुरकर, प्रा. सानिया सदाफ, ज्योतिर्लिंग राउत, परमेश्वर जोंधळे, प्रीती कुरील, काजी नसिरुद्दीन आदींनी परिश्रम घेतले..