शिल्लक राहिलेल्यांना सांभाळा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला
परभणी : उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून भाजपवर केलेल्या टिकेला रविवारी , २९ जुलै रोजी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे सडेतोड उत्तर दिले आहे.
माध्यमांशी बोलताना श्री बावनकुळे म्हणाले, पाठीत खंजीर खुपसणे, पक्ष फोडणे हे उद्धव ठाकरेंच्या रक्तात आहे. त्यांनी मोदींवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाला वेळ दिला तर शिल्लक राहिलेले नेते, कार्यकर्ते त्यांना सोडून जाणार नाहीत, आधी त्यांना साभांळा, असा सूचक सल्ला बावनकुळे यांनी दिला आहे.
बावनकुळे म्हणाले की, पक्ष फोडण्याचे उद्योगधंदे राज्यात भाजपने सुरु केले आहेत. अशी टिका केली जातेय. पण, आम्ही कोणताही पक्ष फोडला नाही. जे आमच्याकडे येत आहेत त्यांना आम्ही नक्कीच प्रवेश देऊ. भाजप हा राजकीय पक्ष आहे. आम्ही संन्याशी नाही. उद्धव ठाकरे दररोज टीका करतात. घरातल्या घरात मुलाखती देतात. यापेक्षा त्यांनी त्यांच्या पक्ष संघटनेत लक्ष दिले तर त्यांच्या पक्षात शिल्लक राहिलेले नेते व कार्यकर्ते इतर पक्षात जाणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमधील सहभागाबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले, की राजकारणाच्या शेवटी सगळेजण देशाचा विचार करतात आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असणारे सगळेच आमच्या सोबत येतील.
राष्ट्राच्या कल्याणाकरता शरद पवार आपला विचार बदलतील अशी मला आशा आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुतीला किमान ४५ जागा मिळतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. पक्षात कुणीही नाराज नाही. सर्व जिल्हाध्यक्षांच्या निवडी योग्य आहेत. आगामी काळात आम्ही इतर इच्छुकांना देखील जबाबदाऱ्या देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाच्या नऊ वर्षाच्या कामांची माहिती घरोघरी जाऊन आम्ही देतोय. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे, असे सांगून सध्या राज्यात विरोधी पक्षाची वाताहत झाली आहे. विरोधी पक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, संभाजी भिडे व नाना पाटोले यांच्या वक्तव्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, नाना पाटोले यांनी अभ्यास करून बोलले पाहिजे. संभाजी भिडे वेगळे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा भाजपची संबंध जोडणे योग्य नाही. संभाजी भिडे यांच्या विधानाची सरकार योग्य ती चौकशी करेल.
जालना-नांदेड समृद्धी महामार्ग : मावेजासाठी शेतकऱ्यांचा ‘टाहो’