समानतेच्या संधीतूनच मुलींच्या उत्कर्षाला मिळेल बळ : न्यायदंडाधिकारी मंदार राऊत यांचे मत; सेलूत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात
सेलू तालुका विधी सेवा समिती, वकील संघ व नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे आयोजन, मुलींची मोठी उपस्थिती
सेलू जि.परभणी : सामाजिक समतोल राखण्यासाठी कुटुंब आणि समाजव्यवस्थेने सर्वच स्तरावर मुलींना समानतेच्या योग्य संधी उपलब्ध करून देणे आणि मुलींच्या उत्कर्षासाठी त्यांना सतत प्रोत्साहित करणे आवश्यक आहे, समानतेच्या संधीतूनच मुलींच्या उत्कर्षाला निश्चितच बळ मिळणार आहे, असे मत सेलू (जि.परभणी) येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मंदार राऊत यांनी सोमवारी (३१ जुलै) व्यक्त केले.
‘ बेटी बचाव, बेटी पढाओ ‘ अभियानांतर्गत सेलू तालुका विधी सेवा समिती, वकील संघ व नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या संयुक्त सहकार्याने नूतन विद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर व शिष्यवृत्ती प्रमाणपत्र वितरण उत्साहात पार पडले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना न्यायाधीश राऊत बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.उमेश खारकर, मार्गदर्शक ॲड.उमेश काष्टे, मुख्याध्यापक नारायण सोळंके, संतोष पाटील आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
न्यायाधीश मंदार राऊत म्हणाले की, गेल्या चार-पाच वर्षांमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकावर मुलीच आहेत. विविध स्पर्धा आणि बोर्डाच्या परीक्षांमध्येदेखील मुलींच्या उत्तीर्णतेचा आणि गुणवत्तेचा टक्का सतत वाढत आहे. घरामध्ये काम करून मुलींनी मिळविलेले हे यश आनंददायी आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांनी आपल्या क्षमता आणि कार्यकर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे लग्नानंतरही मुलींना शिक्षण आणि नोकरीच्या संधी दिल्या पाहिजेत. भेदभावाची सामाजिक मानसिकता बदलून मुलींना पुढे नेण्यासाठी कुटुंब, शाळा आणि सामाजिक स्तरावर पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सजगता दाखविणे आवश्यक आहे, असे न्यायदंडाधिकारी मंदार राऊत यांनी नमूद केले. यावेळी ॲड उमेश काष्टे यांनी ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ अभियान तसेच महिला विषयक कायद्याची सविस्तर माहिती दिली. डॉ.लोया यांनी अध्यक्षीय भाषण केले. याप्रसंगी इयत्ता पाचवी व आठवीतील २९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्रास्ताविकात वीरेश कडगे यांनी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नूतन विद्यालयातील शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन ॲड.महेश वाडेकर, तर काशीनाथ पल्लेवाड यांनी आभार मानले. शिबिराला जेष्ठ विधीज्ञ तुळशीराम चव्हाण, सुरेश खापरखुंटीकर, ॲड.रामेश्वर शेवाळे, ॲड.जयंत डंख, ॲड.दीपक भुक्तर, ॲड. गिरीश साडेगावकर, ॲड.योगेश सूर्यवंशी, ॲड.महेश वाडेकर, ॲड.कृष्णा शेरे, वरिष्ठ लिपिक गणेश कदम, संचारेश्वर कदम आदींसह शालेय विद्यार्थी, विद्यार्थींनी, शिक्षक व कर्मचार्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी शिक्षक सुनील तोडकर, बन्सीलाल पद्मावत, सच्चिदानंद डाखोरे, शैलजा कउटकर, आरती कदम, वर्षा कदम, सूर्यकला सूर्यवंशी, सुनीता सांगुळे, रामकिशन कटारे, अरुण रामपूरकर, केशव डहाळे, गोरखनाथ घायाळ, निर्मला हुगे, अब्दुल भाई आदींसह वकील संघाचे सदस्य, न्यायालयीन कर्मचारी आदींनी सहकार्य केले.
विविध स्पर्धा आणि बोर्डाच्या परीक्षांमध्येदेखील मुलींच्या उत्तीर्णतेचा आणि गुणवत्तेचा टक्का सतत वाढत आहे. घरामध्ये काम करून मुलींनी मिळविलेले हे यश आनंददायी आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांनी आपल्या क्षमता आणि कार्यकर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे लग्नानंतरही मुलींना शिक्षण आणि नोकरीच्या संधी दिल्या पाहिजेत. भेदभावाची सामाजिक मानसिकता बदलून मुलींना पुढे नेण्यासाठी कुटुंब, शाळा आणि सामाजिक स्तरावर पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सजगता दाखविणे आवश्यक आहे, असे न्यायदंडाधिकारी मंदार राऊत यांनी नमूद केले.