महसूल दिन : जनतेला हेलपाटे व्हायला नकोत : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे; महसूल सप्ताहाचा सेलूत उत्साहात शुभारंभ
महसूल दिंडीने वेधले लक्ष : मुलींचे टाळ पथक, बीएलओ, पथनाट्य ठरले आकर्षण
परभणी : एखाद्या माणसाचे काम होत असेल, तर त्यात वेळ घालवू नका. पण, काम होणार नसेल तर, का होत नाही ? याबाबत त्यांना समजावून सांगा, योग्य मार्गदर्शन करा. कामांसाठी सर्वसामान्य नागरिकाला हेलपाटे व्हायला नकोत. अशा आशयाच्या भावना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी व्यक्त केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सेलू (जि.परभणी) येथील साई नाट्य मंदिरात महसूल दिनानिमित्त मंगळवारी, १ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे, स्वाती दाभाडे, निवृत्ती गायकवाड, जीवराज डापकर, शैलेश लाहोटी, तहसीलदार अमित घाडगे, दिनेश झांपले, राजेश सरवदे, माधव बोथीकर, प्रदीप शेलार, कैलासश्चंद्र वाघमारे, सौदागर कांबळे, पल्लवी टेमकर, सुनील कावरखे, महसूल संघटनेचे नानासाहेब भेंडेकर, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद आष्टीकर आदींसह मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी कर्तव्यावर मृत पावलेल्या तलाठी सुभाष होळ, सतीश जोंधळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या वारसांना प्रशासनाकडून सात लाख रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानाच्या रकमेच्या धनादेशाचे वाटप जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी गावडे पुढे म्हणाले की, विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत विनाविलंब पोहोचावा. महसूल प्रशासनाप्रती नागरिकांमध्ये विश्वास वृद्धिंगत होईल, अशा पद्धतीने नागरिकांशी समन्वय व सुसंवाद साधावा. काम होतच नसेल तर योग्य मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या अडचणी तातडीने सोडाव्यात, मुख्यालयी राहून दुष्काळ, अतिवृष्टी, निवडणूक, शेती व शेतकरी आदी संबंधितांच्या आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व पारदर्शकतेने दूर कराव्यात. गेल्या वर्षभरात चांगले काम झाले आहे. पण दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. लेटलतिफांवर कडक कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट ताकीद जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.
डॉ.प्रताप काळे म्हणाले, ” येणाऱ्या काळात आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सचोटी, प्रामाणिकपणा, कार्यतत्परता, तंत्रज्ञानकुशलता, शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षमता यासह जनसामान्यांच्या मनातील महसूल प्रशासनाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. येत्या पाच वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल, यासाठी जबाबदारीने काम करावे लागणार आहे.”
प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कर्तव्यावर मृत पावलेल्या तलाठी सुभाष होळ, सतीश जोंधळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या वारसांना प्रशासनाकडून सात लाख रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला.
गेल्या वर्षभरात परभणी जिल्ह्यात राबवलेल्या विविध उपक्रमांची चित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली. या वेळी उत्कृष्ट कार्याबद्दल विविध संवर्गातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध परीक्षेतील गुणवंत पाल्यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान वाटप, प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. आशीष राठोड व संचाने स्वागत गीत गायीले. सच्चिदानंद डाखोरे, गिरीष दीक्षित यांनी साथसंगत केली. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे यांनी केले. सूत्रसंचालन नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर, मोहन बोराडे यांनी केले. तहसीलदार दिनेश झांपले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तहसीलदार राजेश सरवदे, माधव बोथीकर, प्रदीप शेलार, कैलासश्चंद्र वाघमारे, सौदागर कांबळे, पल्लवी टेमकर, सुनील कावरखे आदींसह तलाठी, महसूल, कोतवाल, पोलिस पाटील, विविध संघटनांचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सेलू उपविभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
यानिमित्ताने सेलू शहरात महसूल दिंडी व महसूल ग्रंथाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. अधिकारी, कर्मचारी रंगबिरंगी फेटे बांधून दिंडीत सहभागी झाले. साईबाबा मंदिर परिसरात माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी उद्योजक जयप्रकाश बिहाणी, रामेश्वर राठी आदींची उपस्थिती होती. श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या मुलींचे टाळ पथक, पांडुरंग पाटणकर यांची ‘बीएलओ’ वेशभूषा आणि विविध शासकीय योजनांची माहिती देण्यार्या कर्मचाऱ्यांच्या पथनाट्याने लक्ष वेधले.