Amrit Bharat Station : सेलू,जिंतूरसाठी शंभर कोटींचा निधी : आमदार मेघना बोर्डीकर; सेलू स्थानकातील पुनर्विकासकामांची पायाभरणी उत्साहात
मान्यवरांसह नागरिकांची मोठी उपस्थिती
सेलू जि.परभणी : रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्थानक’ पुनर्विकास योजनेअंतर्गत सेलू स्थानकावरील पुनर्विकासकामांना रविवारी, ६ ऑगस्ट रोजी उत्साहात सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने फलकाचे अनावरण झाले. या वेळी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, की सेलू, जिंतूर मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे.
सेलू (जि.परभणी) रेल्वे स्थानक परिसरात सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. या वेळी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर बोर्डीकर, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे. रेल्वेचे नोडल अधिकारी बी.हेमा नायक, मुख्याधिकारी देविदास जाधव, नायब तहसीलदार अनिकेत पालेपवाड, प्रवासी संघाचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी, शशिकांत देशपांडे, वरिष्ठ अभियंता शिवय्या मुखेरी, मुख्य तिकीट निरीक्षक प्रदीप जोहिरे, नियंत्रक विजय कांबळे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी आमदार बोर्डीकर यांनी पंतप्रधान मोदींच्या नऊ वर्षांच्या काळातील विविध विकासकामांची तसेच सेलू स्थानकावर २३.२ कोटी रुपये खर्चाच्या पुनर्विकासकामातून केल्या जाणाऱ्या सोयीसुविधांची माहिती दिली. स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, पर्यावरण रक्षक भारतासाठी आणि पंतप्रधान मोदींना साथ देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन केले.
आमदार बोर्डीकर म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पीएम किसानसह अनेक विकासाचे कार्यक्रम राबवले. सर्वसामान्यांसाठी घरकुल योजना, विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरण, देशात नवीन ५०० मेडिकल कॉलेज उघडले आदी विविध योजनांची माहिती दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्य मंत्री मनसुख मंडविय व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे परभणीतील मेडिकल कॉलेज यावर्षी सुरू झाले. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर नुसत्या घोषणा करण्यात आल्या. यापूर्वी परभणी वैद्यकीय महाविद्यालयालाठी नियुक्त अधिष्ठात्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे पथकाद्वारे कॉलेजची परवानगी रद्द करण्यात आली, असा आरोप करीत बोर्डीकर म्हणाल्या की, मेडिकल कॉलेजचा पुन्हा पाठपुरावा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी शब्द दिल्यानंतर, परभणी येथे मेडिकल कॉलेज उभारण्याची खात्री परभणीकरांना दिली. त्याचे फलित म्हणजे यावर्षी परभणी मेडिकल कॉलेजमध्ये १०० विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.
मागील अडीच वर्षाच्या काळात राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस सरकारने काही केले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, असे सांगून आमदार बोर्डीकर म्हणाल्या, की सेलू शहरालगत पाथरी रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम मंजूर झाले असून, लवकरच ते पूर्ण करण्यात येईल. दुहेरीकरणाचे काम देखील पुर्णत्वास जाईल. सेलूसाठी स्वतंत्र १३२ केव्ही वीज केंद्र मंजूर झाले असून लवकरच त्याचीही निविदा निघणार आहे. सेलू एमआयडीसीचा प्रश्न देखील लवकरच सुटेल, अशी ग्वाही आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी याप्रसंगी दिली. यानिमित्ताने रेल्वे विभागातर्फे आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक नोडल अधिकारी बी.हेमा नायक, सूत्रसंचालन नितीन चव्हाण यांनी केले. रेल्वे स्टेशन मास्तर सोमनाथ राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रवासी संघाचे पदाधिकारी, रेल्वेचे कर्मचारी व विविध स्तरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
सेलू शहरालगत पाथरी रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम मंजूर झाले असून, लवकरच ते पूर्ण करण्यात येईल. दुहेरीकरणाचे काम देखील पुर्णत्वास जाईल. सेलूसाठी स्वतंत्र १३२ केव्ही वीज केंद्र मंजूर झाले असून लवकरच त्याचीही निविदा निघणार आहे. सेलू एमआयडीसीचा प्रश्न देखील लवकरच सुटेल, अशी ग्वाही आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी याप्रसंगी दिली.
सेलू शहर संत श्री साईबाबांचे सद्गुरू श्रीकेशवराज बाबासाहेब महाराजांची (व्यंकूशाह) पावन भूमी आहे. त्यामुळे स्थानकाचा दर्शनी भाग तीर्थक्षेत्र धर्तीवर विकसित करावा तसेच; हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यासह सेलूतील स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाबद्दल मुक्तीसंग्रामाच्या प्रेरणादायी स्मृतिचित्रांचा ‘अमृत भारत स्थानक’ पुनर्विकासकामांमध्ये समावेश करावा. यांसह सोयीसुविधांविषयक अनेक उपयुक्त सूचना नागरिकांनी ईमेलद्वारेसुद्धा रेल्वे प्रशासनाला कळविल्या आहेत.