Swatantryaveer : सावरकरांची विचारधारा कोणीही संपवू शकणार नाही : शरद पोंक्षे यांचे मत; सेलूतील वसंत प्रतिष्ठानच्या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Swatantryaveer : सावरकरांची विचारधारा कोणीही संपवू शकणार नाही : शरद पोंक्षे यांचे मत; सेलूतील वसंत प्रतिष्ठानच्या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Swatantryaveer : सावरकरांची विचारधारा कोणीही संपवू शकणार नाही : शरद पोंक्षे

सेलू : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे तळपता सूर्य. त्यांच्या विचाराने प्रेरित माणूस राष्ट्रभक्त व देशभक्त होतोच. सध्या मात्र, ठरवून त्यांना बदनाम करण्याचे कट कारस्थान चालू आहे. परंतु, सावरकर हे एक व्यक्ती नसून, एक विचारधारा आहे. त्यांचे विचार कोणीही संपवू शकणार नाहीत,‌ असे मत ज्येष्ठ नाट्य व चित्रपट अभिनेते शरद पोंक्षे यांनी सेलू येथे व्यक्त केले.
सेलू (जि.परभणी) येथील वसंत प्रतिष्ठानच्या वतीने विधीज्ञ वसंतराव खारकरमामा यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी व्याख्यान आयोजिण्यात आले होते. त्यावेळी पोंक्षे बोलत होते. ‘समग्र सावरकर’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रतिष्ठानचे संयोजक तथा श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे सचिव महेश खारकर, विधीज्ञ उमेश खारकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
सावरकरांनी माफीनामा लिहून दिला म्हणून राहुल गांधी यांनी वारंवार सावरकरांना टीकेचे लक्ष बनवले. याचा पुनरुच्चार करत शरद पोंक्षे म्हणाले की, कायद्याचे कसलेही ज्ञान नाही. त्यांनी सावरकर वाचलेले नाहीत. ब्रिटिशांच्या कायद्यांचा अभ्यासदेखील केलेला नाही. म्हणून अशा प्रकारचे घाणेरडे आरोप त्यांच्याकडून वारंवार केले जातात.‌ दयेच्या अर्जाला राहुल गांधी माफीनामा म्हणतात. हे पूर्णपणे अज्ञानी व चुकीचे आहे. सावरकरांनी अंदमानच्या कारागृहात अकरा वर्षे जे सोसले, ते आपण एक दिवस देखील सहन करू शकणार नाहीत, असे नमूद करून पोंक्षे म्हणाले की, तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या काळात जे राजकीय कैदी कारावासात शिक्षा भोगत असताना, कैद्यांना सरकारकडे दयेचा अर्ज करण्याची ब्रिटिश कायदेमंडळामध्ये तरतूद होती. मात्र, तत्कालीन बहुतांश कैद्यांकडे ब्रिटिश कायद्यांचा अभ्यास नसल्याकारणाने दयेचा अर्ज करण्याबद्दलचे अज्ञान होते. सावरकर यांनी बॅरिस्टर पदवी संपादित केली होती. आणि ब्रिटिश कायदेमंडळाचा अभ्यासदेखील केला होता. त्यामुळे त्यांना ही सर्व माहिती होती.‌ त्या माहितीच्या आधारे त्यांनी, आपली राजकीय शिक्षा कमी करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे स्वतः दयेचा अर्ज केला आणि इतर राजकीय कैद्यांना देखील हा अर्ज करण्यासाठी आग्रह धरला. या पाठीमागचा त्यांचा हेतू असा होता की, आपली उपयोगिता ही केवळ, राष्ट्रासाठी उपयोगात आणली जावी. आपले तारुण्य जर कारागृहात घालावे लागले तर, आपला देश स्वतंत्र कसा होईल ? स्वातंत्र्य लढ्यातील उर्वरित काम आपल्याला कसे करता येईल? त्यामुळे केवळ देश व राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन परिस्थितीत मुत्सद्यगिरीचा वापर करून, ब्रिटिश कायद्यातील तरतुदीनुसार आपली कारागृहातील शिक्षा कमी करण्यासाठी सावरकरांनी अकरा वेळा सरकारकडे दयेचा अर्ज केला. याच अंदमानातील कारागृहात त्यांना ब्रिटिश सरकारने दिलेला त्रास, त्यांची सात बाय अकराची अंधारी कोठडी. आंघोळीसाठी तीन तांबे समुद्राचे खारे पाणी. उभे आडवे साखळदंड. एकाच जागेवर सगळी विधी व तेथेच निकृष्ट दर्जाचे भोजन. हे सगळं कल्पनेबाहेरच आहे. हे कोणीही सहन करणार नाही. मात्र, सावरकर यांनी ते राष्ट्र व देशासाठी सहन केले. याची जाणीव त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना झाली पाहिजे. विनाकारण अपूर्ण ज्ञानात त्यांच्यावर आरोप करणे चुकीचे असल्याचे शरद पोंक्षे यांनी यावेळी स्पष्ट केले. हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांची लायकी नाही,अशी माणसे खोटे नाव वापरून घाणेरडे लिहीत-बोलत आहेत. याचे कारण सुसंस्कृत समाज गप्प आहे. यामुुळे लायकी नसलेल्या माणसांसाठी सोशल मीडिया कुरण झाले आहे, असेही परखड मत पोंक्षे यांनी यावेळी व्यक्त केले.
व्याख्यानाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर व विधीज्ञ वसंतराव खारकरमामा यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. पोंक्षे यांचा स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनीही पोंक्षे यांचे यथोचित स्वागत केले. प्रास्ताविक महेश खारकर, सूत्रसंचालन प्राध्यापक संजय पिंपळगावकर, तर उमेश खारकर यांनी आभार मानले. अल्का धर्माधिकारी व श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘ जयो स्तुतै ‘ गायीले. गंगाधर कान्हेकर व सिद्धार्थ एडके यांनी साथसंगत केली. श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌

कुठलाही पुरावा नसताना, देशातील व राज्यातील महापुरुषांबद्दल अपशब्द काढणे चुकीचे आहे. विचार पटत नसतील, तरीदेखील सामान्य माणसानेही कोणत्याही महापुरुषांबद्दल चुकीचे बोलू नये, असे मत पोंक्षे यांनी व्यक्त केले. भविष्यात ” मी नथुराम गोडसे बोलतोय” या नाटकाचे ५० प्रयोग करणार असल्याचेही शरद पोंक्षे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Swatantryaveer : सावरकरांची विचारधारा कोणीही संपवू शकणार नाही : शरद पोंक्षे यांचे मत; सेलूतील वसंत प्रतिष्ठानच्या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद


जिंतूर-सेलूतील सिंचनाचा अनुशेष दूर होणार : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर


Amrit Bharat Station Scheme : सेलू स्थानकाच्या २३ कोटींच्या पुनर्विकासकामांचा रविवारी शुभारंभ; पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!