आदरांजली : प्राचार्य डॉ.बोराडे, महानोर, नरके यांच्या स्मृती जागविल्या; सेलूत विविध स्तरातून आदरांजली
परभणी : सेलू् येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात गुरुवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ.प्रतापराव बोराडे, कवीवर्य ना.धों.महानोर, विचारवंत प्रा.हरी नरके यांना विविध स्तरातून आदरांजली वाहण्यात आली. सेलू नागरी सहकारी पतसंस्था, शब्दसह्याद्री, अक्षर प्रतिष्ठान व ग्रंथालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.
अध्यक्षस्थानी ज्ञानोबा बोराडे होते.या वेळी डॉ.गंगाधर गळगे यांनी प्राचार्य डॉ.बोराडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्राचार्य डॉ.प्रतापराव बोराडे यांचे शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात भरीव योगदान होते. ते जीवन आनंदी कसे जगावे याचा वस्तुपाठ होते, असे डॉ.गळगे म्हणाले. कवी शरद ठाकर यांनी ना.धों.महानोर यांचा साहित्यपट उलगडून सांगितला. ठाकर म्हणाले, ” शेती, माती आणि माणसात रमणारे ना.धों.महानोर हिरव्या बोलीचा शब्द होते. शेती, शेतकरी, साहित्य, चित्रपट, राजकारण क्षेत्रात महानोरांचे भरीव योगदान राहिले. त्यांनी ग्रामीण कवितेला प्रतिष्ठा मिळवून दिली. महानोरांच्या जाण्याने मातीचा गंध लाभलेली कविता हरवली आहे.” डॉ.अशोक पाठक यांनी प्रा.नरके यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. हरी नरके यांनी अभ्यासपूर्ण संशोधनातून महात्मा फुले यांच्याकडे पाहाण्याची नवी दृष्टी समाजाला दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. यासाठीचे त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे, असे पाठक यांनी नमूद केले.
प्रास्ताविक सुरेश हिवाळे, सूत्रसंचालन प्राध्यापक अनंत मोगल, तर प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी आभार मानले. मुकेशराव बोराडे, प्रा.प्रभाकर रावते, भाऊराव भाबट, करूणा बागले, गौतम सूर्यवंशी, चंद्रशेखर मुळावेकर, महादेव आगजाळ, रवि कुलकर्णी आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. विलास शिंदे, अनिरुद्ध टाके, सुयोग साळवे यांनी पुढाकार घेतला.