मुक्तीसंग्रामपर्व म्हणजे सुवर्णपान : सतीश कुलकर्णी यांचे प्रतिपादन, सेलूतील नूतन विद्यालयात कार्यक्रम
परभणी : हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे पर्व म्हणजे आपल्याला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठीचे एक सुवर्णपान होते, असे प्रतिपादन स्वातंत्र्यसैनिकपुत्र तथा नूतन विद्यालयाचे माजी विद्यार्थी सतीश कुलकर्णी (नांदेड) यांनी सोमवारी (१४ ऑगस्ट) केले.
‘मेरी माँटी मेरा देश’ या उपक्रमाच्या निमित्ताने कुलकर्णी यांनी सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांशी सोमवारी संवाद साधला. या वेळी मुख्याध्यापक नारायण सोळंके, उपमुख्याध्यापक संतोष पाटील आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी सतीश कुलकर्णी यांनी, वडील स्वातंत्र्य सैनिक गोविंदराव देशमुखगुरुजी यांचे स्मरण करीत त्यांच्या हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि वंदेमातरम् चळवळीतील सहभागाविषयी माहिती दिली. शाळेतील वंदेमातरम् सभागृह त्याची आठवण करून देते, असे नमूद करून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेला स्वातंत्र्य लढ्याची मोठी परंपरा आहे. विद्यार्थ्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करावे. या लढ्याची माहिती घ्यावी. कोणत्याही क्षेत्रात असला, तरी शाळेला विसरू नका, असे आवाहन कुलकर्णी यांनी या वेळी केले. प्रास्ताविक अशोक लिंबेकर यांनी केले. संतोष पाटील यांनी आभार मानले. डी.डी.सोन्नेकर, के.के.देशपांडे, काशीनाथ पल्लेवाड, गणेश माळवे, बाबासाहेब हेलसकर, सच्चिदानंद डाखोरे आदींसह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.