शासन आपल्या दारी : परभणीमध्ये आज जिल्हास्तरीय विशेष कार्यक्रम; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
प्रशासन सज्ज : कडेकोट सुरक्षा; विविध विभागांची ८० दालने, लाभार्थ्यांना आणण्यासाठी ४०० बसेस
परभणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी, २७ ऑगस्ट रोजी आयोजिण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ जिल्हास्तरीय विशेष कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत शुक्रवारी तयारीची माहिती गावडे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी साडेबारा वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरात हा कार्यक्रम आहे. याप्रसंगी खासदार डॉ.फौजिया खान, खासदार संजय जाधव, आमदार बाबाजानी दुर्राणी, विप्लव बाजोरिया, सतीश चव्हाण, विक्रम काळे, आमदार सुरेश वरपुडकर
डॉ.राहुल पाटील, मेघना साकोरे- बोर्डीकर, रत्नाकर गुट्टे आदी लोकप्रतिनिधींसह विभागीय आयुक्त मधुकर आर्दड, विशेष पोलिस महानिरीक्षक शशिकांत महावरकर आदींची उपस्थिती राहणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विविध विभागामार्फत गेल्या साडेचार महिन्यात ८ लक्ष ७४ हजार ७३८ लाभार्थ्यांना १४४६ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे, तर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात विविध विभागाच्या २० लाभार्थ्यांसह एकूण १२०० लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी गावडे यांनी सांगितले. प्रशासनाने कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन केले आहे. २३ पेक्षा जास्त नोडल अधिकारी, ८२ सहाय्यक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ७ पोलीस उपअधीक्षक, १२० पोलीस अधिकारी आणि ८५० पोलीस अंमलदारांचा बंदोबस्त राहणार आहे. व्यवस्थेसाठी संपर्क अधिकारी, समन्वयकांच्या नेमणुका केल्या आहेत. विविध पथके गठीत करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांना देण्यात येणारी निवेदने स्वीकारण्यासाठी स्वतंत्र मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विविध योजनांची माहिती देण्यासाठी साधारण ८० दालन उभारण्यात आले आहेत. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ४०० बसेसची तसेच आठ ठिकाणांसह तालुकानिहाय मार्ग व पार्किंग व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधिक्षक रागसुधा आर., मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले आहे.
सेलूतील श्रीशंकरलिंग मंदिरात प्राणप्रतिष्ठा महोत्सव उत्साहात;