CM Eknath Shinde : सर्वसामान्यांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला परभणीमध्ये मोठा प्रतिसाद, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती
परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात असून, राज्यात ‘शासन आपल्या दारी’ या थेट लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणार्या क्रांतिकारी उपक्रमांच्या माध्यमातून महायुतीचे सरकार सर्वसामान्यांच्या हिताला आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे आणि पुढेही क्रांतीकारी निर्णयाद्वारे हे काम सुरूच राहणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठवाड्यासह राज्यात पावसाने ओढ दिली आहे. यामुळे शेतकरी संकटात आहे. पण, शेतकऱ्यांनी काळजी करू नये. सरकार शेतकऱ्यांना वार्यावर सोडणार नाही, तर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर रविवारी, २७ ऑगस्ट रोजी आयोजिण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, आमदार सुरेश वरपूडकर, बाबाजानी दुर्राणी, डॉ.रत्नाकर गुट्टे, मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार विक्रम काळे, विप्लव बाजोरिया, बालाजी कल्याणकर, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विशेष पोलिस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रागसुधा आर., कुलगुरू डॉ.इंद्र मणी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, सीईओ विनय मून, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, मुख्यमंत्री कार्यालयातील खाजगी सचिव डॉ.अमोल शिंदे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी खासदार सुरेश जाधव,ॲड. गणेशराव दुधगावकर, माजी आमदार माणिकराव आंबेगावकर, मोहन फड, हरिभाऊ लहाने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, राजेश देशमुख, आनंद भरोसे, शिवसेना शिंदेगटाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव शिंदे, महानगराध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, प्रताप देशमुख आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ यामुळे परिवर्तन दिसून येत आहे. विशेषत: लाभार्थ्यांच्या चेहर्यावरील भाव समाधान, आनंद देणारा आहे. यामध्ये सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींचे योगदानही निश्चितच मोठे आहे. या माध्यमातून सरकारला आशीर्वादाचे बळ मिळत आहे. योजनेतून २२ हजारांवर ट्रॅक्टर, ४ हजारांवर पॉवर टिलर, २२ हजार ५०० रोटावेटर वितरीत करण्यात आले आहेत. १ हजार ३५१ कोटी रुपये कृषिक्षेत्रावर खर्च झाले आहेत, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेतृत्वामुळे राज्यातील विविध पायाभूत, प्रकल्प, रस्ते आदी विकासकामांना केंद्रसरकारचे मोठे पाठबळ मिळते आहे. योजना जलदगतीने मार्गी लागत आहेत, असे शिंदे यांनी नमूद केले.
परभणीतही विकासाची गंगा आणू
पुणे, मुंबईपुरताच विकास मर्यादित न ठेवता विकासाची गंगा चांद्यापासून बांद्यापर्यंत आणीत परभणीपर्यंत निश्चितपणे आणू, असा ग्वाही देत, शिंदे यांनी परभणी शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावू. सिमेंटचे चकचकीत रस्ते, भूमीगत गटारे, पाणी पुरवठा योजनांकरीता आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल. समृध्दी महामार्ग, सेलूतील औद्योगिक वसाहतीचा प्रश्नही मार्गी लावू, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनीही मार्गदर्शन केले.
दरम्यान, कार्यक्रमस्थळी येण्यापूर्वी राजगोपालाचारी उद्यानातील मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृतिस्तंभावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यानिमित्ताने स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव डावरे व दिवंगत स्वातंत्र्यसैनिक गणपतराव रेंगे यांच्या पत्नी गयाबाई रेंगे यांचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तसेच विविध योजनांच्या २० लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात लाभ देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. सूत्रसंचालन सिमंतिनी कुंडीकर यांनी केले.
विरोधकांवर टीकास्त्र
दरम्यान, “यावर काही बोलायचे नाही, हा इथला विषय नाही.”, असे नमूद करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा १३ एप्रिलरोजी पाटणमधून सुरुवात झाली. त्यावेळी पाटण्यात विरोधक स्वार्थाची, द्वेषाची खिचडी शिजविण्यासाठी एकत्र आले होते, असे नमूद करून ‘शासन आपल्या दारी’ या योजनेवर काही लोक आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. आधी म्हणयाचे, सरकार पडणार पण, सरकार पडता पडता अजित पवार आले आणि आणखी सरकार मजबूत झाले आहे. आता मुख्यमंत्री बदलणार म्हणतायेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुख्यमंत्री तुम्हाला चालत नाही. पचनी पडत नाही का, असा थेट सवाल करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.
कितीही गुगल्या टाका
देश चंद्रावर गेलाय पण, याआधीचे सरकार घरात बसून ऑनलाईन कारभार पाहात होते. या सरकारला करंटचा एक झटका देऊन लाईनवर आणले, असा टोला लगावत शिंदे यांनी, नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सकाळपासून रात्रीपर्यंत कितीही भोंगे लावावेत. शिव्याशाप द्यावेत. त्याचा परिणाम होणार नाही. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांच्या व्यथा आम्हाला तिघांनाही आणि मंत्रीमंडळाला समजातेय. म्हणून थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यक्रमांना मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाने त्यांचा जळफळाट होतेय, पायाखालची वाळू सरकली आहे. हजारो लोक एकत्र येतायेत ते त्यांना बघवत नाही. असेच कार्यक्रम सुरू राहिले, तर आमचे काय होणार याची भीती मनामध्ये निर्माण झाली आहे, असे टीकास्त्र विरोधकांवर सोडून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आम्ही अशाच कामांना प्राधान्य देत राहणार. काही लोक रोज गुगल्या टाकून राजकारणामध्ये गोंधळ निर्माण करत आहेत. त्यांना ते करू द्या. विरोधकांनी कितीही गुगल्या टाकल्या तरी हे सरकार भक्कमपणे उभे राहणार आहे. आम्हाला विकासाचे काम पुढे न्यायचे आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
सर्वसामान्यांच्या व्यथा आम्हाला तिघांनाही आणि मंत्रीमंडळाला समजातेय. म्हणून थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यक्रमांना मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाने त्यांचा जळफळाट होतेय, पायाखालची वाळू सरकली आहे. हजारो लोक एकत्र येतायेत. ते त्यांना बघवत नाही. असेच कार्यक्रम सुरू राहिले, तर आमचे काय होणार याची भीती मनामध्ये निर्माण झाली आहे, असे टीकास्त्र विरोधकांवर सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही महायुतीचे सरकार सर्वसामान्यांच्या हिताला आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत राहणार.
परभणीतील ‘शासन आपल्या दारी’लाईव्ह
सामान्यांच्या जीवनात परिवर्तन करणारे सरकार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस