मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
परभणी : राज्यातील शेतकरी कष्टकरी, गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातून सर्वांचा विकास करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य शासन काम करत असून, सर्वांना सोबत घेऊन राज्याचा विकास करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला दिली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पुढील महिन्यात शासन स्तरावर विभागीय आढावा बैठक घेण्यात येणार असून, लवकरच राज्य शासनाकडून मराठवाड्याच्या सर्वागिण विकासाबाबत योग्य निर्णय घेण्यात येतील, शेतकऱ्यांबाबतही ठोस महत्वाचे निर्णय घेण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर रविवारी, २७ ऑगस्ट रोजी आयोजिण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी मार्गदर्शन करतांना उपमुख्यमंत्री अजित पावर बोलत होते.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, आमदार सुरेश वरपूडकर, बाबाजानी दुर्राणी, डॉ.रत्नाकर गुट्टे, मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार विक्रम काळे, विप्लव बाजोरिया, बालाजी कल्याणकर, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विशेष पोलिस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रागसुधा आर., कुलगुरू डॉ.इंद्र मणी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, सीईओ विनय मून, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, मुख्यमंत्री कार्यालयातील खाजगी सचिव डॉ.अमोल शिंदे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी खासदार सुरेश जाधव,ॲड. गणेशराव दुधगावकर, माजी आमदार माणिकराव आंबेगावकर, मोहन फड, हरिभाऊ लहाने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, राजेश देशमुख, आनंद भरोसे, शिवसेना शिंदेगटाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव शिंदे, महानगराध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, प्रताप देशमुख आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
परभणी जिल्ह्याला ऐतिहासिक प्राचिन वास्तूंचा मोठा वारसा लाभला असून, त्यांच्या जतन व संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या कामासाठी सर्वजण पुढे याल, असा विश्वास व्यक्त करुन राज्यात ‘शासन आपल्या दारी’ या अभियानामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांचे शासकीय कार्यालयातील होणारे हेलपाटे, वेळ आणि पैसाही वाचत असून, हा कार्यक्रम राज्यभर लोकप्रिय होत असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. राज्यात यंदा पावसाचा मोठा खंड पडला असून, राज्य शासन आपल्या खंबीरपणे पाठीशी उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला. राज्यातील पीक परिस्थितीबाबत नुकताच व्हीसीद्वारे आढावा घेतला असून, त्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक पावले उचलली असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
पावसाच्या मोठ्या खंडामुळे राज्यातील धरणातील जीवंत पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी असून, पाणी वापराबाबतचेही नियोजन करण्यात येत आहे. मराठवाड्यात पावसाळ्याचे अजून काही दिवस बाकी असल्याचे सांगून ते म्हणाले की, सध्या मराठवाड्यातील संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेण्यात येत आहे. पाणी वापराचे योग्य नियोजन करून नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करत त्यांनी वनविभागाने गवताचा लिलाव न करण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रारंभी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची संकल्पना विशद करुन लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभांविषयी माहिती दिली. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गंत जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाविषयी सविस्तर माहिती दिली.
विविध योजना आणि सेवांचा लाभ
यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. यामध्ये तृतीयपंथीयांना ओळखपत्र, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा योजना, कृषी यांत्रिकीकरण, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र, कर्मवीर दादासाहेब सबळीकरण व स्वाभीमान योजना, रमाई घरकुल योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, शबरी आवास योजना, वैयक्तीक शौचालय अनुदान, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, वैयक्तीक कर्ज परतावा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना या योजनाचा यावेळी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –
• परभणी जिल्ह्यातील पायाभूत विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द
• ‘शासन आपल्या दारी’ ही या देशातील क्रांतीकारी योजना
• आतापर्यंत १ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ
• जिल्ह्यात ८ लाख ७५ हजार लाभार्थ्यांची नोंदणी, त्यांना सुमारे १ हजार ४६४ कोटींचे लाभ
• सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचं काम हे सरकार करीत आहे
• परभणी शहरात अमृत योजनेतून भुयारी गटार बांधण्यात येणार, त्यासाठी निधी देण्यात येईल.
• परभणी शहरातील कॉंक्रिटच्या रस्त्यांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
• मुंबई-नागपूर-गोवा या शक्तीपीठ महामार्गाचा मराठवाड्याला फायदा होईल.
• रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं काम गतीने सुरु आहे.
• औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नावर कार्यवाही केली जाईल.
• नाट्यगृह, पाण्याच्या योजना, औद्योगिक वसाहतीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
• राज्याच्या काही भागात पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनो काळजी करु नका, शासन खंबीरपणे पाठीशी उभे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
CM Eknath Shinde : सर्वसामान्यांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे