‘रानपाखरं’मध्ये काळाला जिंकू पाहाणारी कविता : डॉ.कैलास अंभुरे; कविता संग्रहाचे सेलूत प्रकाशन
सेलू : शेतकरी, सैनिक,जिजाऊ शिवबा या तीन भूमिकेतून ‘ रानपाखरं ‘ या कविता संग्रहात कविता लिहिलेली आहे. सध्याचा काळ हा भयंकर आहे. अशा काळाला जिंकण्याचा प्रयत्न करणारा ‘ रानपाखरं ‘ हा कविता संग्रह आहे. असे प्रतिपादन समीक्षक डॉ. कैलास अंभुरे (औरंगाबाद) यांनी केले. सेलू येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान, जिजाऊ ज्ञानतीर्थ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन विद्यालयाच्या कै.राजेंद्र बन्सीलालजी गिल्डा सभागृहात रविवारी, १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कवी आत्माराम कुटे यांच्या ‘रानपाखरं’ कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. समीक्षक डॉ.कैलास अंभुरे यांच्या हस्ते आत्माराम कुटे यांच्या ‘रानपाखरं’ या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सर्जेराव लहाने होते. कविता संग्रहाचे भाष्यकार म्हणून दीपक रंगारी (वर्धा) हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.नितीन लोहाट, ग्रंथमित्र भास्कर पिंपळकर, छबुराव भांडवलकर यांची उपस्थिती होती. डॉ.कैलास अंभुरे म्हणाले की, ” कवी आत्माराम कुटे हे कवितेशी प्रामाणिक आहेत. ते रानात राबणारे, कुणबी कुळातले कवी आहेत. त्यांच्या ‘ रानपाखरं ‘ या कविता संग्रहातील कवितेत माॅ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मावळे येतात. शेतकरी म्हणून जगताना येणारे अनुभव या कविता संग्रहात आहेत. ‘ कविता संग्रहाचे भाष्यकार दीपक रंगारी आपल्या मनोगतात म्हणाले की, ‘ आत्माराम कुटे हे तुकारामांच्या पठडीतील कवी आहेत. या कविता संग्रहातील कवितेत शेती, शेतकरी आणि समाजाविषयीचे सुक्ष्म चिंतन प्रकर्षाने जाणवते. याप्रसंगी राज्य सरकारच्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्काराबद्दल योगेश ढवारे, जिल्हा परिषद परभणीच्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराबद्दल माणिक पुरी, मानवत, मारूती डोईफोडे, पूर्णा, शरद ठाकर, सेलू या उपक्रमशील शिक्षकांचा, तर महाराष्ट्राचा बालकवी पुरस्कार अनया ढाकणे या विद्यार्थीनीला जाहीर झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुरेश हिवाळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. आभार बाळू बुधवंत यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राचार्य उत्तरेश्वर शिंदे, मुख्याध्यापक संदीप कऱ्हाळे, लहू घरजाळे, नितीन घुंबरे, शिवाजी बोबडे, जिजाऊ ज्ञानतीर्थच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.