रस्त्याचे काम निविदेप्रमाणे तात्काळ पूर्ण करा
सेलू तालुका दबाव गटाची मागणी, मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
सेलू जि.परभणी : सेलू शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका रस्त्याचे काम निविदा प्रक्रियेनुसार तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका रस्त्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. निविदा प्रक्रियेनुसार हा रस्ता व त्या बाजूची नाली व दोन बाजूचे काम मुदतीत पूर्ण करण्याचे काम संबंधित ठेकेदाराचे आहे. त्यावर नियंत्रण करण्याचे काम अधिकारी वर्गाचे आहे. मात्र, केवळ रस्ता काम झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूची कामे न झाल्याने हा रस्ता अत्यंत अडचणीचा झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुचाकी, चारचाकी वाहने उभी राहतात. त्यामुळे रस्त्यावर वाहन चालविणे अत्यंत जोखमीचे झालेले आहे.
अधिकारी वर्गाचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्यामुळेच ठेकेदाराद्वारे मनमानी पद्धतीने काम करण्यात येत आहे. परिणामी वाहतुकीस अत्यंत अडथळा निर्माण होत आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे. सतत वाहनांची ये-जा सुरू असते. मोठी वाहनेही सतत ये-जा असते. त्यामुळे या रस्त्याचे सर्व काम तातडीने पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. तसे आदेश संबंधित ठेकेदार व अधिकारी यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. सेलू तालुका दबाव गटाचे निमंत्रक अॅड. श्रीकांत वाईकर यांच्या नेतृत्वाखाली ओमप्रकाश चव्हाळ, अॅड. टी.ए.चव्हाण, इसाक पटेल, सतीश काकडे, लक्ष्मण प्रधान, रामचंद्र कांबळे, दिलीप मगर, परमेश्वर कादेे, आबासाहेब भुजबळ, मुकुंद टेकाळे, लिंबाजी कलाल, रौफ भाई, नारायण पवार, उमेश काटे, गुलाब पौळ, उत्तम गवारे, उध्दव सोळंके, अॅड.योगेश सुर्यवंशी, अजित मंडलीक, विलास रोडगे, मतिन दादामिया, दत्तराव कांगणे, अॅड.देवराव दळवे आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले आहे.