मोबाईलमुळे भाषा कौशल्य विकासाला अडथळा
सेलूतील गणेशोत्सव व्याख्यानमाला परिसंवादातील सूर
सेलू जि.परभणी : मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदुच्या अनेक गंभीर समस्या पुढे येत असून, मुलांच्या लेखन, वाचन, मनन, चिंतन आदींसह भाषा कौशल्य विकासाला मोठा अडथळा निर्माण होत आहे, असा सूर सेलू येथील गणेशोत्सव व्याख्यानामाला परिसंवादातून उमटला.
‘मुलांचे रिल्स व पालकांचा रोल’ या विषयावर सोमवारी परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी उद्योजक महेश खारकर होते. यावेळी डॉ.स्मिता देऊळगावकर, योगेश ढवारे, विद्यार्थी म्हणून अथर्व सौदागर, विद्या इंगोले, ऋतुजा रोडगे यांनी भूमिका मांडली. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांना पाठीचा मणका, डोळे, कान व मेंदूच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पालकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. श्लोक, भगवतगीता, प्रार्थना असे विविध उपक्रम घ्यावेत, याशिवाय छंद जोपासू द्यावा, असा सुर या परिसंवादातून निघाला. सूत्रसंचालन प्रणिता सोलापुरे यांनी केले, तर प्रिती सराफ यांनी आभार मानले.