शिक्षकांच्या महाआक्रोश मोर्चाला मोठा प्रतिसाद
परभणीमध्ये शिक्षण संस्था महामंडळासह विविध संघटनांचे ठिकठिकाणी धरणे आंदोलन
परभणी : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या कंत्राटी भरती, शाळा दत्तक योजना, समूह शाळांसंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात, सोमवारी, दोन ऑक्टोबररोजी राज्य शिक्षण संस्था महामंडळ, मुख्याध्यापक संघ, विविध समविचारी पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले, तर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक समन्वय महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या आक्रोश महामार्चाने परभणी शहर दणाणून सोडले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक समन्वयक महासंघाच्या वतीने सोमवारी दुपारी ज्ञानोपासक महाविद्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश महामोर्चाला काढण्यात आला. सर्व प्रकारची अशैक्षणिक कामे, कार्पोरेट कंपन्यांना सरकारी शाळा दत्तक द्यावयाचा आदेश तसेच लोकप्रतिनिधींकडून शिक्षकांविषयी अवमानकारक वक्तव्याबाबत मानभंगाची कारवाई करावी यासह अन्य मागण्यांकरीता महिला शिक्षकही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. विविध मागण्यांचे फलक लक्षवेधी ठरले. शिक्षक समन्वय महासंघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव भोसले, वसंतराव डासाळकर, विलासराव कदम, दिलीप लाड, युवराज अंधारे, मुंजाराम मुंढे, दिपक पंडीत, कविता पौळ, नारायणराव जाधव, किशनराव इदगे आदींसह पदाधिकारी व शिक्षक मोर्चात सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
शिक्षण संस्था महामंडळ व विविध समविचारी संघटना, पालक विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालय व तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सात ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात शैक्षणिक संघर्ष सप्ताहाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या शिक्षण विषयक धोरणाविरोधात प्रदर्शन करण्यात येणार आहे. राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह तथा माजी आमदार अॅड.विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष संतोष धारासूरकर, सूर्यकांत हाके, उदयराव देशमुख, अजयराव गव्हाणे, लालसेनेचे गणपत भिसे, बळवंतराव खळीकर, रवि देशमुख, डी.बी.माने, बालासाहेब भांगे, राजू शिंदे, डी.बी.आंभोरे, महेश पाटील, डी.डी.मोरे, निसार पटेल, यशवंत मकरंद, संतोष गायकवाड, एस.डी.देशमुख, जी.एच.हारकळ आदींसह पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारच्या कंत्राटी भरतीसह शाळा दत्तक योजनेवर कडाडून टिका करण्यात आली. कंपन्यांद्वारे कंत्राटी शिक्षकांच्या भरतीचा निर्णय क्रूर चेष्टा करणारा आहे, असे नमूद करून यापुढे लढा तीव्र करण्याची घोषणा महामंडळाचे सरकार्यवाह अॅड.गव्हाणे यांनी यावेळी जाहीर केली.