परशूराम महामंडळ स्थापनेचा प्रश्न मार्गी लावा
परभणीतील आमदार संवाद बैठकीत ब्राह्मण समाजाची मागणी
परभणी : परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजाच्या उन्नतीकरीता महत्त्वपूर्ण आहे. राज्य सरकारने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी. महामंडळ स्थापनेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीच्या वतीने समस्त ब्राह्मण समाजाकरीता रविवारी, एक ऑक्टोबररोजी आमदार संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जिंतूरच्या भाजप आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी डॉ.संजय टाकळकर होते. भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, बंडूनाना सराफ, बाळुगुरू असोलेकर, नरहरीगुरू जोशी, रुपेश व्यास महाराज, डॉ.अशोक सेलगावकर, संयोजक स्वप्नील पिंगळकर यांची उपस्थिती होती.
ब्राह्मण समाजातील तरूणांना शिक्षण घेतेवेळी अनंत आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. योग्य वेळी योग्य ते आर्थिक बळ मिळत नाही. त्यामुळे अनेक तरुण नैराश्यातून खर्चाविना शिक्षणापासून वंचित राहू लागले आहेत. नोकरी, स्पर्धा परीक्षा तयारी, उच्च शिक्षणासाठी आर्थिक साहाय्याची नितांत गरज आहे. तसेच शिष्यवृत्ती व मार्गदर्शन केंद्र महत्वाचे आहे, असे मत पिंगळकर व योगेश जोशी यांनी मांडले. परशुराम विकास महामंडळ निर्मिती गरजेची असून यासाठी संयुक्त प्रयत्न केले जातील. यासंदर्भात शिष्टमंडळाद्वारे लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधणार आहोत, असे आश्वासन आमदार बोर्डीकर यांनी यावेळी दिले. प्रास्ताविक विश्वंभर काठवटे, सूत्रसंचालन विशाल जोशी, तर आभार पिंटू देशमुख यांनी मानले. संवाद मेळाव्याला परभणी, गंगाखेड, पाथरी, मानवत, जिंतूर, सेलू, पालम आदी तालुक्यातील ब्राह्मण समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती.