Pradhan Mantri Awas Yojana : मानवत पंचायत समितीला प्रथम पुरस्कार; सेलू दुसऱ्या, पालम तृतीय स्थानावर

Pradhan Mantri Awas Yojana : मानवत पंचायत समितीला प्रथम पुरस्कार; सेलू दुसऱ्या, पालम तृतीय स्थानावर

विविध उपक्रमांमध्ये नरवाडी, आडगाव, बोंदरवाडीही अव्वल

परभणी : केंद्र शासनपुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य शासनपुरस्कृत घरकुल योजनेची २०२२-२३ मध्ये प्रभावी अंमलबजावणी करून उत्कृष्ट काम केल्याबद्दल मानवत पंचायत समितीला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर सेलूला द्वितीय आणि पालम पंचायत समितीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हा समन्वय आणि संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार संजय जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर, जिल्हा विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जीवराज डापकर व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणीच्या उद्देशाने २०२२-२३ या कालवधीत राज्यात अमृत महाआवास अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या संस्था व व्यक्तींना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मधून अमृत महाआवास अभियान २०२२-२३ या वर्षात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वोकृष्ट काम केल्याबद्दल मानवत पंचायत समितीला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला तर सेलू द्वितीय आणि पालम पंचायत समितीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
तालुका स्तरावर अमृत महाआवास अभियान २०२२-२३ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या केंद्र पुरस्कृत योजनेत सर्वोकृष्ट क्लस्टर पुरस्कारामध्ये सोनपेठ तालुक्यातील नरवाडी ग्रामपंचायतीला प्रथम, पूर्णा तालुक्यातील कावलगाव द्वितीय आणि जिंतूर तालुक्यातील वस्सा ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना प्रदान करण्यात आला. यामध्ये अनुक्रमे रवि आडे, एन.जी. शेवाळे आणि स्वाती रोडे या अभियंत्यांनी पुरस्कार स्वीकारला, तर राज्य पुरस्कृत योजनेमध्ये जिंतूर तालुक्यातील आडगाव (बाजार) प्रथम, पालम तालुक्यातील पेठशिवणी द्वितीय तर सोनपेठ तालुक्यातील नरवाडीला तृतीय पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार अनुक्रमे प्रतिक जगताप, ऋषिकेश वाघमारे आणि आनंद गंगावणे यांनी स्वीकारले.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) केंद्र पुरस्कृत योजनेमधून अमृत महाआवास अभियान २२-२३ या वर्षात मानवत तालुक्यातील बोंदरवाडी प्रथम, गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी द्वितीय आणि मानवत तालुक्यातील वझुरला (खुर्द) तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. तसेच राज्य पुरस्कृत योजनेमध्ये जिंतूर तालुक्यातील चारठाणा, गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी आणि पूर्णा तालुक्यातील ममदापूरचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, अभियंता, ग्रामसेवक आणि संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच उपसि्थत होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!