‘निम्न दुधना’मृतसाठ्याजवळ; पिण्याच्या पाण्याच्या संकटाची चिन्हे !

‘निम्न दुधना’मृतसाठ्याजवळ; पिण्याच्या पाण्याच्या संकटाची चिन्हे !

चार महिन्यांत केवळ २२ दलघमी वाढ; जिवंत पाणीसाठा २८ टक्क्यांवरच

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सेलू नगरपालिककेकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. आगामी काळात पाऊस होईल न होईल, परंतु उन्हाळ्यामध्ये शहराला पाणी टंचाई भासणार नाही. त्यासाठी तारेवरची कसरत मात्र करावी लागेल. खबरदारी घ्यावी लागेल. नागरिकांनीही पाणीवापराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. – देविदास जाधव, मुख्याधिकारी, सेलू जि.परभणी

परभणी : गेल्या चार महिन्यांत सेलू (जि.परभणी) तालुक्यातील निम्न दुधना सिंचन प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित मोठा पाऊस झाला नाही. अवघ्या २२ दलघमी पाण्याची आवक झाली. आगामी काळात पाऊस न झाल्यास, काही दिवसांतच प्रकल्प मृतसाठ्याजवळ जाऊ शकतो. या सर्व परिस्थितीत प्रकल्पावर अवलंबित गावांच्या योजनांना पाणीपुरवठ्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

प्रामुख्याने जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा आणि परभणी जिल्ह्यातील सेलू शहरासह शेकडो गावाच्या पाणी पुरवठा योजना प्रकल्पातील पाणी साठ्यावर अवलंबून आहेत. परतीच्या पावसात अपेक्षित पाण्याची आवक झाली नाही, तर जून २०२४ पर्यंत पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल असे चित्र आहे. पाणलोट क्षेत्रातील जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर प्रकल्पात वेगाने पाणी साठा होतो. मात्र, पावसाने खंड देत हजेरी लावली. त्यामुळे निम्न दुधनाच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ झालेलीच नाही. गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्याने प्रकल्पात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. परंतु, ७५ टक्के साठवण क्षमता मर्यादा करण्यात आल्याने अधिकच्या पाण्याचा दुधना नदीपात्रात सतत विसर्ग करण्यात आला. सिंचनासाठी पाणी दिल्यानंतर मे महिन्यात पाणीपातळी ३२ टक्के होती. याच महिन्यात उन्हाळी पिकांना पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाणी पातळी आणखी कमी झाली. आता सिंचनासाठी पाणी मिळण्यातही अडचणी निर्माण होतील. गतवर्षी पाणलोट क्षेत्रात ७२५ मिलीमीटर पाऊस झाला. या वर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत केवळ ५१७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाची तीव्रता पाहता, गेल्या चार महिन्यांमध्ये केवळ २२ दलघमी पाण्याची आवक झाली. जूनमध्ये १.६५, जुलै‌ ९.५८६, ऑगस्ट २.१६, सप्टेंबर ९.२२ दलघमी पाणी आले. चार ऑक्टोबर २०२२ रोजी जिवंत पाणी साठा १८१.७८० दलघमी (७५.०५ टक्के) होता. सद्यस्थितीत ६८.६३८ दलघमी (२८.३४ टक्के) आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. धरणाची जोता पातळी ४१८.५०० मीटर आहे, तर सध्याची पाणी पातळी ४२२.७५० मीटरवर आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये पाणी पातळी जोत्याखाली गेली होती. त्यावेळी परतूर, मंठा, सेलू शहरातील यंत्रणेला कसरत करीत पाणीपुरवठा करावा लागला. चार वर्षांनंतर हीच परिस्थिती निर्माण होते की काय, अशी भिती आहे. आता परतीच्या पावसावरच सर्व भिस्त आहे.

निम्न दुधनाच्या पाणलोट क्षेत्रातील ५६७ हेक्टर क्षेत्राचा भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकल्प शंभर टक्के भरल्यानंतर परतूर आणि मंठा तालुक्यातील असंपादित जमिनीवर पाणी साचत होते. त्यामुळे २०१० पासून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.‌ अखेर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जून २०२२ पासून साठवण क्षमता ७५ टक्केच ठेवण्यात आली होती. त्यामुळे गेल्या पावसाळ्यात अतिरिक्त पाण्याचा सतत विसर्ग करण्यात आला. त्यामुळ पाऊस झाला तरी भूसंपादनाचे भिजत घोंगडेसुटल्याशिवाय भविष्यातही शंभर टक्के पाणी साठणार आहे हे मात्र निश्चितच.


Pradhan Mantri Awas Yojana : मानवत पंचायत समितीला प्रथम पुरस्कार

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!