‘निर्भय बनो’आंदोलनाला बळ का मिळतेय ?

 ‘निर्भय बनो‘आंदोलनाला बळ का मिळतेय ?

‘निर्भय बनो’ आंदोलन : भूमिका व स्वरूप 

‘निर्भय बनो’ ही घोषणा सर्वप्रथम गांधीजींनी बिहारमधील चंपारणच्या निळीच्या सत्याग्रहात (१९१७) दिली होती. चंपारण्यात निळीचे मळेवाले जमीनदार तिथल्या शेतकऱ्यांवर जुलूम करत होते. त्यांच्या शोषणाला, नाडवणुकीला कंटाळून हे शेतकरी गांधीजींकडे गेले. त्यानंतर गांधीजींनी चंपारण्याचा दौरा केला. त्यांच्या असं लक्षात आलं की कायदे बदलण्यासाठी संघर्ष करण तुलनेनं सोपं आहे; पण जनतेच्या मनातील मळेवाल्यांची भीती व दहशत दूर करणं हे दूरगामी दृष्टीने महत्त्वाचं आहे, ते झालं तर बाकीचे प्रश्न मार्गी लागतील, आणि तसंच घडलं. शेतकरी निर्भयपणे आंदोलनाला उभे राहिले आणि त्यांनी चंपारणचा सत्याग्रह यशस्वी केला. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा पहिला लढा होता. चंपारणच्या लढ्याने भारतातल्याच नाही तर जगभरातील लोकांच्या हातात ‘सत्याग्रह’ हे नवीन हत्यार दिलं.

‘निर्भय बनो’ या दोन अक्षरी मंत्रात जे सामर्थ्य दडलेलं आहे त्याची प्रचिती चंपारणपासून आजवर जे जे लढे झाले त्या प्रत्येक लढ्यात आलेली आहे. मनुष्य निर्भय झाल्याशिवाय कृतीप्रवण होऊ शकत नाही. मनातून भय निघून जाणं ही कुठलाही बदल घडवण्यासाठीची पहिली पायरी असते. त्यामुळे आजही ‘निर्भय बनो’ हा नारा देत नागरिकांना कृतीप्रवण करण्याच्या उद्देशाने हे आंदोलन उभं राहिलं आहे.

भारत गेली काही वर्षं अत्यंत अस्वस्थ सामाजिक-राजकीय वातावरणाचा आणि समाजविघातक ध्रुवीकरणाचा सामना करतो आहे. राजकीय संस्कृतीचं तर कधी नव्हे असं अवमूल्यन झालं आहे. धर्मांधतेने जनमानसाचा कब्जा घेतला आहे. असत्य आणि द्वेष ही प्रचारतंत्राची दोन प्रमुख हत्यारे बनली आहेत. लोकशाही मार्गाने निवडून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यपद्धतीत मात्र लोकशाही, लोकांचे संवैधानिक अधिकार याविषयीची आस्था दिसत नाही. अन्यथा नरेंद्र मोदींनी आंदोलकांना उद्देशून ‘आंदोलनजीवी’ हा हेटाळणीयुक्त शब्द वापरला नसता. दडपशाही हे या सरकारचं धोरण असल्याचं वारंवार दिसून आलं आहे. आपल्या विरोधात जे आंदोलन करतात ते देशद्रोही आहेत असं मानून त्यांच्यावर कायदेशीर आणि राजकीय कारवाई केली जाते. शिवाय मानसिक खच्चीकरणही केलं जातं. तीन शेती कायद्यांच्या विरोधात एक वर्ष सुरु असलेल्या शिस्तबद्ध, शांततामय आंदोलनात हे दिसून आलं. या आंदोलनाला खलिस्तानवादी, देशद्रोही ठरवण्यात आलं. शेतकरी आंदोलक दिल्लीत येऊ नयेत यासाठी दिल्लीची नाकेबंदी करण्यात आली. त्यांना हरप्रकारे छळण्यात आलं. पण आंदोलकांची एकजूट, शिस्त आणि निडरता अतुलनीय होती. त्यांच्या निर्धारापुढे अखेरीस केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली.

नोटबंदीसारखा तुघलकी निर्णय घेणाऱ्या या सरकारला धोरणात्मक आघाडीवर आलेल्या अपयशाचे इतरही दाखले देता येतील. अनेक नामांकित अर्थतज्ज्ञ, धोरणविषयक अभ्यासक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सातत्याने सद्य परिस्थितीचं विश्लेषण करत आहेत, सरकारला सावध करत आहेत. पण हे सरकार, सरकारचे समर्थक आणि ज्यांच्याविषयी न बोललेलंच बरं अशी पत्रकारितेला रसातळाला नेणारी मुख्य धारेतील माध्यमे हे सर्वजण मात्र विद्यमान सरकार जणू आकाशातून अवतरित झालं आहे अशा अविर्भावात वावरत आहेत. आयटी सेलच्या माध्यमातून मुस्लिमांविषयी पद्धतशीरपणे पसरवला जाणारा द्वेष, असत्याचा प्रचार व प्रसार, विरोधी मत मांडणाऱ्याला ‘देशद्रोही’ हे लेबल चिकटवणं, आपली तळी उचलणारे पत्रकार सोडता इतर पत्रकारांना किंमत न देणं (आपल्या संपूर्ण कार्यकाळात एकही पत्रकार परिषद न घेणारे नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत), अदानीसारख्या बड्या उद्योगपतींना राजरोसपणे पाठीशी घालणं, आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याऐवजी गतकाळात रमण्याला प्रतिष्ठा मिळवून देणं, निवडणूक आयोग- सीबीआय- इडी यासारख्या स्वायत्त संस्थांचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणं अशा अनेक मुळे आज सुजाण नागरिकांच्या मनात या सरकारविषयी संताप निर्माण झाला आहे.

या अस्वस्थतेला वाट करून देण्यासाठी, आपण निवडून दिलेल्या सरकारला प्रश्न विचारण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचं बळ नागरिकांना देण्यासाठी ‘निर्भय बनो’ आंदोलन प्रयत्नशील आहे. आंदोलनाचा तत्कालिक उद्देश विद्यमान सरकारच्या हुकूमशाहीविरोधात जनचळवळ उभी करणे, जनहिताच्या मुद्द्यांवर या सरकारला प्रश्न करणे, हा असला तरी तो एकमेव उद्देश नाही. राज्यसंस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वायत्त संस्था निर्माण झालेल्या असल्या तरी देशातील नागरिकांनीही आपली शक्ती उभी करणं कायमच आवश्यक असतं, कारण त्यातूनच खरी ‘सहभागी लोकशाही’ सुदृढ होत असते. (आज जेव्हा स्वायत्त संस्थाच कमकुवत केल्या जात आहेत तेव्हा तर नागरिकांवरील जबाबदारी आणखीनच वाढली आहे). त्यामुळे विद्यमान भाजप सरकारच्या विरोधात सुरु झालेलं हे आंदोलन उद्या हे सरकार नसेल आणि दुसऱ्या सरकारने अशाच प्रकारची हुकूमशाही लादायला सुरुवात केली, भारतातील वैविध्याची, सौहार्दाची वीण उसवायला सुरुवात केली तर त्याही सरकारच्या विरोधात उभ राहील.

तत्कालिक कारणाने सुरु झालेलं निर्भय बनो आंदोलन एक कायमस्वरूपी ‘जनमंच’ म्हणून आकारास आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आंदोलनाचे प्रवर्तक आणि आंदोलनात सहभागी असलेले इतर अनेकजण यांनी कायदा, आरोग्य, शिक्षण, अर्थकारण, लिंगभाव समता, पब्लिक पॉलिसी विकासनीती, पर्यावरण, शेती, पत्रकारिता, विवेकवाद अशा विविध क्षेत्रात भरीव योगदान ” दिलं आहे. आंदोलनाला या सगळ्यांच्या तांत्रिक व वैचारिक क्षमतांचा भक्कम पाठिंबा आहे आणि त्याचा दूरगामी उपयोग होणार आहे. आंदोलनाला राजकीय भूमिकेचं वावडं तर नाहीच; पण पक्षीय राजकारणात उतरण्याचंही वावडं नाही. किंबहुना पुरोगामी विचारधारेने राजकारणाला कमी लेखल्यानेच आजची परिस्थिती उद्भवली आहे असं आमचं निरीक्षण आहे. त्यामुळे सामाजिक तसंच राजकीय दोन्ही आघाड्‌यांवर सक्रिय राहण्याचा आंदोलनाचा मनसुबा आहे.

लोकशाहीत केंद्रस्थानी असतात, असायला हवेत ते लोक. राजकारण आणि सत्ताकारणाच्या साठमारीत लोकांनी मूक दर्शक बनून राहू नये, आपला सक्रिय सहभाग नोंदवावा आणि सत्तेला विधायक अर्थ प्राप्त करून द्यावा यासाठी अधिकाधिक लोकांनी या आंदोलनाशी जोडून घ्यावं आणि एका दीर्घ पल्ल्याच्या जनचळवळीला प्रारंभ करावा असं आवाहन आम्ही करत आहोत.

स्वरूप

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, पर्यावरणतज्ज्ञ आणि सामाजिक-राजकीय विश्लेषक डॉ. विश्वंभर चौधरी, कायदेतज्ञ आणि मानवाधिकार कार्यकर्ते ॲड.असीम सरोदे यांच्या पुढाकाराने ‘निर्भय बनो’ आंदोलनाला सुरुवात झाली असली तरी ही पूर्णपणे लोककेंद्री चळवळ आहे. व्यक्तिकेंद्री नाही. या चळवळीला कुणी एक नेता नाही. सत्य आणि अहिंसा या दोन तत्त्वांचं उल्लंघन न करता आपापल्या ठिकाणी कुणाही व्यक्तीने वा गटाने ही चळवळ सुरु करावी.

आज ‘निर्भय बनो’चा मुख्य भर वैचारिक परिवर्तनावर आहे. अधिकाधिक भारतीय नागरिकांनी भारतीय लोकशाहीपुढील धोके समजून घ्यावेत आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करावे हा चळवळीचा एक स्पष्ट उद्देश आहे. त्यासाठी लोकांमध्ये अनेक पातळ्यांवर वैचारिक जागृती होणं आवश्यक आहे… व्याख्यान, चर्चा, मुलाखती, छोट्या-मोठ्या गट चर्चा, कोपरा सभा, समाजमाध्यमांवरील लेखन वा व्हिडीओ या व अशा इतर मार्गांनी ही जागृती होऊ शकेल. यासाठी ‘निर्भय बनो’शी जोडलेल्या ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, आपसात एक नेटवर्क तयार करावे आणि कृती कार्यक्रम आयोजित करावेत. अशा कार्यक्रमांसाठी ‘रिसोर्स पर्सन’ म्हणून निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे त्यांच्या वेळेनुसार हजर राहू शकतील, पण प्रत्येक वेळी त्यांनीच हजर असायला हवं असं नाही. विविध क्षेत्रातील अनेक अभ्यासक ‘निर्भय बनोशी जोडलेले आहेत. विषयाच्या गरजेनुसार त्यांच्यातील कुणी अभ्यासक अशा कार्यक्रमांना उपस्थित राहू शकतील.

” निर्भय बनो”ला कोणतेही औपचारिक वा संस्थात्मक रूप नाही. ही चळवळ प्रामुख्याने वैचारिक चळवळ आहे. ती लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून उभी राहील.

गेल्या काही वर्षात असं लक्षात आलं आहे की छोट्या संख्येने होणारी आंदोलने, कृती कार्यक्रम फारसे यशस्वी ठरत नाहीत. शिवाय आजचे सत्ताधारी, त्यांचे डिजिटल सैन्य आणि या सत्ताधाऱ्यांची तळी उचलून धरणारी माध्यमे जनआंदोलनांना मोडून पाडण्यात, त्यांना बदनाम करण्यात आघाडीवर आहेत. सर्वसामान्य लोकांकडून आंदोलनांना एके काळी ज्या प्रमाणात समर्थन मिळत असे तसे समर्थनही आज मिळताना दिसत नाही. त्यामुळे यासंदर्भात ‘निर्भय बनो’ आंदोलनाने आपलं धोरण निश्चित केलं आहे. ते असं की छोट्या कृती कार्यक्रमांना, निदर्शनांना ‘निर्भय बनो’चे पूर्ण समर्थन असले तरी ‘निर्भय बनो’ स्वतः असे छोटे कृतीकार्यक्रम आयोजित करणार नाही आणि संख्यात्मकदृष्ट्या मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनात सक्रिय असेल. असे कार्यक्रम वारंवार होऊ शकणार नाहीत, पण जेव्हा होतील तेव्हा त्यांचा मोठा प्रभाव पडेल. अर्थात हे छोट्या कृतीकार्यक्रमांना लागू आहे. चर्चा, अभ्यास या स्वरूपाच्या कार्यक्रमांबाबत ” निर्भय बनो’ची भूमिका वर स्पष्ट केलीच आहे.

वैचारिक परिवर्तन हा गाभा असल्याने ‘निर्भय बनो’ ही एक सातत्याने चालणारी, दीर्घ पल्ल्याची प्रक्रिया आहे. भूमिकेत स्पष्टपणे नोंदवल्याप्रमाणे भाजप सरकारची वृत्ती व कारभार ही या आंदोलनाची तत्कालिक कारणं असली तरी सजग नागरिकांचा कायमस्वरूपी दबावगट तयार करणे हे या आंदोलनाचं अंतिम उद्दिष्ट आहे. त्यामुळे थोड्या वेळात काही चमकदार कृतीकार्यक्रम करण्यापेक्षा राजकरणावर दीर्घ काळ प्रभाव टाकू शकेल अशी लोकशक्ती निर्माण करणं याला हे आंदोलन प्राधान्य देणार आहे. भाजपविरुद्ध सुरु झालेल्या या चळवळीत विरोधी राजकीय पक्षांचं, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या संस्था-संघटनांचं सहकार्य घ्यायला ‘निर्भय बनो’ तयार आहे. याचा अर्थ या राजकीय पक्षांना ‘निर्भय बनो’चा संपूर्ण पाठिंबा आहे असा नाही. भूमिकेत नोंदवल्याप्रमाणे येत्या काळात ‘निर्भय बनो’ आंदोलन प्रत्यक्ष पक्षीय राजकारणातही सहभागी होऊ शकेल.

***

( हा मजकूर ‘निर्भय बनो’ चळवळीच्या भूमिका पत्रातील आहे. नागरिकांपर्यंत चळवळीची भूमिका पोहोचावी हाच उद्देश आहे.- सकाश न्यूज )

निर्भय बनो – भूमिका व स्वरूप


अ.भा.मराठी पत्रकार परिषद : एस.एम.देशमुख साधणार सेलूतील पत्रकारांशी संवाद; आज कार्यक्रम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!