शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर करा; अन्यथा तीव्र आंदोलन : माजी आमदार विजय भांबळे यांचा इशारा
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : विविध मागण्या तात्काळ मंजूर करण्याची मागणी
या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जिंतूर- सेलू तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा. विमा कंपनीला पंचनामे करून रक्कम अदा करण्यासाठी आदेशित करण्यात यावे. चालू वर्षात २५% आग्रीम पिक विमा देण्यासाठी पिक विमा कंपनीला आदेश दिलेले होते. परंतु, कंपनीने अजूनही शेतकऱ्यांना काहीच मदत केलेली नाही. शेतकऱ्यांना २५% ऐवजी १००% अग्रीम मंजूर करावा. – माजी आमदार विजय भांबळे, जिंतूर
परभणी : जिंतूर, सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करण्यात याव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना गुरुवारी, १२ ऑक्टोबररोजी निवेदन देण्यात आले.
जिंतूर व सेलू तालुक्यात या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सोयाबीन व कापूस उत्पन्नाचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे सरकारने सोयाबीन आठ हजार व कापूस दहा हजार रुपये दराने खरेदी करण्यासाठी आदेश काढावे. खरेदीकेंद्र चालू करावे. सन २०१८ मधील अतिवृष्टी तसेच २०२१-२२ च्या ऑगष्ट महिन्यामधील सततच्या पावसाने नुकसानीसाठी जाहीर करण्यात आलेली हेक्टरी १३,६०० रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी. मागील वर्षीचा मंजूर पिक विमा जमा करण्यात यावा. जिंतूर व सेलू तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मुग, हळद, फळबाग आदी पिक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जिंतूर- सेलू तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा. विमा कंपनीला पंचनामे करून रक्कम अदा करण्यासाठी आदेशित करण्यात यावे. चालू वर्षात २५% आग्रीम पिक विमा देण्यासाठी पिक विमा कंपनीला आदेश दिलेले होते. परंतु, कंपनीने अजूनही शेतकऱ्यांना काहीच मदत केलेली नाही. शेतकऱ्यांना २५% ऐवजी १००% आग्रीम मंजूर करावा. पाऊस नसल्याने नागरिकांची तसेच जनावरांची पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चारा छावणी व विहीर, बोअर अधिग्रहणासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. जिंतूर व सेलू तालुक्यातील ३३ केव्ही सबस्टेशन ओव्हरलोड झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही. सब स्टेशनसाठी नवीन पाच ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात यावे. शहरी व ग्रामीण भागात गावठाणसाठी १०० केव्हीचे डी.पी.बसवण्यात यावेत. सिंगलफेज ऐवजी थ्री फेजचे शंभर ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात यावेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सिंचन विहिर कामाचे कुशलची बिले अदा करावीत. मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर माजी आमदार विजयराव भांबळे यांच्यासह रामराव उबाळे, प्रसादराव बुधवंत, प्रकाश मुळे, सुधाकर रोकडे, वबाळासाहेब घुगे, विठ्ठल घोगरे, मनोज थिटे, माऊली राऊत, पुरुषोत्तम पावडे, चंद्रकांत गाडेकर, विजय खिस्ते, विशाल देशमुख, शिवराम कदम, परवेज सौदागर आदींच्या सह्या आहेत.
Indian Stepwells : आर्वी, चारठाणा, पिंगळी, वालूरची चौकोनी बारव पोस्टकार्डवर