नवरात्र महोत्सव : भोगावमध्ये श्री जगदंबा देवीसाहेबच्या भाविकांचा उत्साह

नवरात्र महोत्सव : भोगावमध्ये श्री जगदंबा देवीसाहेबच्या भाविकांचा उत्साह

विविध पारंपरिक धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रम, अन्नदान

देवी भागवतात भोगाव येथील श्री जगदंबा देवी साहेब या स्थळाचा उल्लेख सापडतो. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम वनवासात असताना त्यांनी येथील आदीशक्तीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असल्याची अख्यायिका सांगितली जाते.‌ त्यानंतर सुमारे पाचशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात येथील मोरे घराण्यामध्ये देशमुखी बहाल करण्यात आली. तेंव्हापासून मंदिराची व्यवस्था, मूर्तीपुजेचा मान मोरे-देशमुख घराण्याकडेच आहे – प्रमोद पांडे, ज्येष्ठ पुरोहित, भोगाव देवी

परभणी : जिंतूर (जि.परभणी) तालुक्यातील भोगाव येथील प्राचीन देवीसाहेब संस्थानच्या आदीशक्ती श्री जगदंबा मातेच्या मंदिरात शेकडो वर्षांपासूनची नवरात्र महोत्सवाची परंपरा आहे.‌ विशेष म्हणजे भेदभाव बाजूला सारुन चालत आलेली मातंग समाजातील महिलेच्या परडी पूजनाची परंपरा आजही जपली जात आहे. या वर्षीही विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न होत आहेत.भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून गेला आहे.
सह्याद्री डोंगर रांगाच्या कुशीत जिंतूर-औंढा नागनाथ महामार्गावर भोगाव पाटीपासून तीन किलोमीटरवर निसर्गरम्यस्थळी श्रीजगदंबेचे पुरातन दगडी मंदिर आहे. तुळजाभवानीचे उपपीठ म्हणून ओळख असलेले हे शक्तीपीठ असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान आहे. मंदिरात जगदंबेची चार फूट उंचीची आसनस्थ मूर्ती काळ्या गुळगुळीत पाषाणात कोरलेली असून शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. गाभाऱ्याबाहेरील होमकुंड महाष्टमीच्या उत्तररात्री व नवमीला भल्या पहाटे मोकळा केला जातो. जेष्ठ पुरोहित प्रमोद पांडे यांनी सांगितले की, देवी भागवतात या स्थळाचा उल्लेख सापडतो. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम वनवासात असताना त्यांनी येथील आदीशक्तीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असल्याची अख्यायिका सांगितली जाते.‌ त्यानंतर सुमारे पाचशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात येथील मोरे घराण्यामध्ये देशमुखी बहाल करण्यात आली. तेंव्हापासून मंदिराची व्यवस्था, मूर्तीपुजेचा मान मोरे-देशमुख घराण्याकडेच आहे. त्यासाठी देवस्थानला दीडशे एकर शेतजमीन दान देण्यात आली. याच कालावधीत मंदिर परिसरात सिंचन तलावाची निर्मिती करण्यात आली. विश्वस्त समिती अध्यक्ष माजी आमदार गुलाबचंद राठी, उपाध्यक्ष भगवानराव देशमुख, सचिव प्रल्हादराव देशमुख, नामदेव शेवाळे, सुभाषचंद्र तिवारी, विठ्ठलराव मोरे, प्रमोद पांडे संस्थानचा कारभार सांभाळतात. दरवर्षी चैत्रमासी यात्रा व अश्विन महिन्यांतील शारदीय महोत्सव मंदिरात पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. या काळात नऊ दिवसांची यात्रा भरते. वेदमुनी जीवन जोशी, गणेश जोशी यांच्या पौरोहित्याखाली आरती, रुद्राभिषेक, षोडशोपचार पूजा, सप्तशती, अथर्वशीर्ष, श्रीसुक्त, श्रीभवानी सहस्त्रनाम पाठ तसेच नवार्ण पारायण जप, वेद व यजुर्वेद संहिता आदी दैनंदिन कार्यक्रमासह भोगीचे कार्यक्रम होतात. दररोज महाप्रसाद असतो. हजारो भाविक धरणे पारण्याचे उपवास करतात. महाअष्टमी व नवमीला मोठे महत्त्व आहे. अष्टमीला रात्री कुमारिका व होम पूजा करण्यात येते. याकाळात देवीचे दर्शन बंद असते. दुसऱ्या दिवशी नवमीला पहाटेच होमकुंडात कोहळ्याची पुर्णाहुती दिली जाते.(पूर्वी अजबळी दिला जात असे.) त्यानंतर परडी पूजनाने पारणे सोडतात. उत्सवात सर्व जातीधर्माचे लोक सहभागी असतात. दर्शनासाठी जिंतूर आगाराच्या विशेष बस फेर्‍या सुरू आहेत. संस्थानतर्फे भाविकांची व्यवस्था करण्यात आली आहे.‌ पोलिसांचा बंदोबस्त चोख आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!