रस्त्याअभावी महिनाभरात तिघांचा मृत्यू; जिंतूर तालुक्यातील भुसकवडीतील घटना

रस्त्याअभावी महिनाभरात तिघांचा मृत्यू; जिंतूर तालुक्यातील भुसकवडीतील घटना

पक्क्या रस्त्यासाठी डझनभर विनंत्यानंतरही पदरात मरणच


खराब रस्ता हृदय विकाराच्या झटक्यासाठी चांगला असतो, त्यासाठी चांगल्या रस्त्याची आवश्यकता नाही. भुसकवडी वासियांनी पक्क्या रस्त्यासाठी प्रशासनाचे पाय धरण्यापेक्षा मला प्रत्येकी एक एक्कर शेती ठोक्याने द्यावी त्यात गांजा लागवड करून मी रस्ता मिळवून देतो. – भगवान दराडे, जिल्हा महासचिव, परभणी, वंचित बहुजन आघाडी


रत्नदीप शेजावळे

जिंतूर : गावाला पक्का डांबर रस्ता नसल्यामुळे जिंतूर शहरापासून तीस कि.मी.अंतरावर असणाऱ्या भुसकवडी गावातील तब्बल तीन लोकांना महिनाभरात आपला जीव गमवावा लागला आहे. यात एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. पक्का डांबर रस्त्याअभावी वेळेवर दवाखान्यात पोहचू न शकल्याने महिनाभरात एकाच गावातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पक्का डांबर रस्त्याच्या मागणीसाठी डझनभर विनंती निवेदन देऊनही न्यायाव्यतिरिक्त पदरात केवळ मरण पडत असल्याने गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. विकासाचा ढोल वाजविणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि पुढाऱ्यांना ही मोठी चपराक आहे.

अधिक माहिती अशी की, गावात मागील महिनाभरात मयत झालेल्या पैकी वच्छलाबाई गंगाराम चिलगर (वय ९०) या वार्धक्याने आजारी होत्या, त्यांचेवर आडगाव येथे वेळोवेळी उपचार सुरू होते. खुशाल बाबाराव घुगे (वय ५०) आणि पिराजी विठोबा पोले (वय ५०) या दोघांना पंधरा दिवसांच्या फरकाने रात्रीच्या वेळी हृदय विकाराचा झटका आला होता. या दोघांना गावातील खाजगी वाहन करून पुढील उपचारासाठी जिंतूरकडे आणले जात होते. भुसकवडी ते आडगाव बाजार हे नऊ किमी खराब रस्त्याचे अंतर पार करत असताना पुढील उपचारासाठी बराच वेळ झाल्याने मृत्युने त्यांना “रस्त्या”त गाठले. खराब रस्त्यामुळे दोन्ही परिवारातील घरातील कुटुंबप्रमुख कर्तेपुरुष गमावले आहेत. जिंतूर तालुक्यातील दिडशे कुटुंब असणारे भुसकवडी हे गाव हिंगोली जिल्हा सिमेवर वसले आहे. पक्का डांबर रस्ता मिळावा यासाठी गावकऱ्यांनी आजवर अनेक आंदोलन केली आहेत. परंतु प्रशासन आणि राजकीय पुढारी यांनी आजवर केवळ आश्वासनाच्या बोळवणीवर वेळ मारून नेली आहे. देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा केला जात असला तरी आजघडीला भुसकवडी गाव मात्र अद्यापही मुलभूत सुविधांच्या विकासापासून वंचित राहिले आहे. यापूर्वीही अनेक लोकांच याच पद्धतीने बळी गेला आहे. रस्त्याअभावी गावातील मुलींचे लग्न शिक्षण आरोग्य याबरोबरच ईतर मूलभूत गरजा देखील भेडसावत असल्याने गावाचे पुनर्वसन करा किंवा रस्ता द्या अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. गाव विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनीधींना ही जोरदार चपराक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर यापुढील सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकन्याच्या तयारीत असल्याची माहिती भुसकवडी ग्रामस्थांकडून दिली आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!