Maratha Reservation : मराठ्यांच्या आशापात्रात रक्षणाचा जोगवा टाका : बाळू महाराज गिरगावकर यांचे सरकारला आवाहन
सेलूतील साखळी उपोषणामध्ये बाळू महाराज गिरगावकरांचे समाज प्रबोधनपर कीर्तन, श्रोत्यांची मोठी उपस्थिती
परभणी : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या बेचाळीस दिवसांपासून छोटेसे सात्विक युद्ध सुरू केले आहे. या युद्धात शस्त्र नाही, तर आशेचे पात्र आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या पात्रात रक्षणाचा जोगवा टाकून विद्यमान सरकारमधील बुद्धिवंतांनी मराठ्यांच्या आंतरिक भावनेच्या युद्धाला यश द्यावे, असे आवाहन हभप बाळू महाराज गिरगावकर यांनी गुरूवारी केले.
सेलू (जि.परभणी) येथील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. यानिमित्ताने गुरूवारी, २६ ऑक्टोबररोजी रात्री आठ वाजता आयोजिण्यात आलेल्या समाज प्रबोधनपर कीर्तनात गिरगावकर महाराज बोलत होते. महाराज म्हणाले, की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील एक सर्वसामान्य माणूस आहे. गठुड्याला भूलणारा हा माणूस नाही. म्हणून त्यांना किंमत आहे. त्यांचे नेतृत्व समाजाने स्वीकारले आहे. जरांगे यांच्या मनात मराठा समाजाविषयी अत्यंतिक तळमळ, निष्ठेची भावना आहे. याच भावनेने त्यांनी उभारलेल्या गरजवंत मराठ्यांच्या लढ्याच्या समर्थनातून संपूर्ण मराठा समाजसुद्धाला एक आशेचा किरण मिळाला आहे. सात्विकतेने, शुद्ध अंत:करण आणि प्रसन्नतेने आंदोलन पुढे नेण्यासाठी समाज एकवटला आहे. न्याय मागत आहे. त्यामुळे विद्यमान सरकारने मराठा समाजाच्या आंतरिक भावनांची कदर करून न्याय देण्यासाठी लेखणी चालवावी, असे आवाहन हभप बाळू महाराज गिरगावकर यांनी केले. आंदोलनादरम्यान कुणीच कुणाचा मत्सर, व्देष, इर्ष्या करू नका. कीर्तनकारांनीसुद्धा या आंदोलनात बोलतांना वाणी सांभाळून बोलावे, असेही गिरगावकर महाराज यांनी यावेळी नमूद केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक, महिला, श्रोते, समाज बांधव उपस्थित होते.