संविधान लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : मिलिंद बोकील

संविधान लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : मिलिंद बोकील

मानवतमध्ये सर्वोदय मित्र कार्यकर्ता संमेलन उत्साहात

परभणी/मानवत  : आम्ही भारताचे लोक जेव्हा एकत्र येतो तेव्हा भारताचे संविधान त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहाते, असे मत अभ्यासक व विचारवंत मिलिंद बोकील (पुणे ) यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाच्या वतीने मानवत (जि.परभणी) येथे दोन दिवसीय सर्वोदय मित्र कार्यकर्ता संमेलनात बोकील बोलत होते. ‘राजनितीकडून लोकनितीकडे’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी प्राचार्य आत्माराम टेंगसे होते. बोकील म्हणाले, ” महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचा वारसा लोकनिती आहे. राजनितीच्या विरोधी अथवा पर्यायी शब्द म्हणून लोकनिती शब्द वापरले जातात. चांगली लोकं राजकारणात गेली तर राजकारण चांगले होईल मात्र; ते शक्य नाही म्हणून राजनितीऐवजी लोकनितीचा वापर करण्याचे गांधी आणि विनोबांंनी सुचविले. लोकनिती प्रत्यक्षात आणता येईल काय यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.”
वरवर पाहता लोकशाही म्हणजेच लोकनिती. मात्र मागील ७५ वर्षातील अनुभव हा पक्षशाहीचा राहिला आहे. जनतेवर राजकीय पक्षांची हुकूमशाही आहे. सध्याचे महाराष्ट्राचे चित्र बघितले, तर राजकारणासाठी सर्व पक्ष एकत्र आलेले दिसतात. त्यामुळे मतदारांना जागरूक करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी निष्पक्ष उमेदवार निवडून देणे, त्यांच्यावर अंकुश ठेवणे आणि स्वतः कारभार करणे या गोष्टी आवश्यक आहेत. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य आत्माराम टेंगसे म्हणाले, ” सर्वोदयाचा विचार खालपर्यंत पाझरला पाहिजे. ग्रामीण, शालेय, महाविद्यालयीन पातळीवर कार्य होणे गरजेचे आहे. या वेळी नूतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांच्या हस्ते बोकील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संचालन प्राचार्य अशोक चिंदूरवार यांनी केले. दोन दिवसीय संमेलनामध्ये विविध मान्यवर व अभ्यासकांनी विचार मांडले. सर्वोदय मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!